पंढरपूरला देवदर्शनाला जाताना भीषण अपघात : बोलेरो गाडीतील 5 जण ठार

कोल्हापूर | पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सरवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील जयवंत पोवार त्यांच्या कुटुंबियांसमवेत पंढरपूरला देवदर्शनासाठी जाताना भीषण अपघात झाला आहे. रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव बोलेरो चारचाकी आणि विटाने भरतेता ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात 5 जण ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली. एकाच बोलेरो गाडीतून सात जण देवदर्शसाठी निघाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये सोहम पवार (वय- 12), जयवंत पोवार (वय- 45), कोमल शिंदे (वय 60), लखन शिंदे (वय- 60) (सर्व रा. सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर ) यांचा समावेश आहे. अपघातात 35 वर्षीय चालकाची ठार झाला असून त्याचे नाव अद्याप कळालेले नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी- नागपूर या रस्त्याचा बायपास रस्ता दोन दिवसांपूर्वी सुरु झाला असून सदर या बायपास रस्त्यावर राजीव गांधी नगर या ठिकाणी विटांनी भरलेली ट्रॉली विरोधी दिशेने आल्याने बोलेरो (MH- 09- DA- 4912) गाडीने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बोलेरो गाडीतील तीन पुरुष, एक महिला व एका बारा वर्षाच्या मुलाच्या जागीच मृत्यू झाला आहे. मयत पाच जण हे सरवडे येथील (ता. राधानगरी) आहेत. तर या अपघातात तीन जण जखमी झाले असून एका जखमी महिलेची स्थिती गंभीर आहे.
याबाबतची नातेवाईकांना माहिती मिळताच ते तात्काळ मिरजेला रवाना झाले आहेत. जखमी तिघांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली, पोलीस उपाधीक्षक अजित टीके, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देशमुख, महात्मा गांधी चौकीचे भालेराव यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. सरवडे येथील सर्व व्यवहार बंद करण्यात आले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.