छ. उदयनराजेंचा थेट इशारा : प्रत्येक जिल्ह्यात अडीच- तीन हजार पोलिस, एकदा रान पेटलं तर…

सातारा | देव तर मी बघितला नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने देव काय असतो. महाराजांनी सर्वधर्माची संपल्पना मांडली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी वादग्रस्त विधान करणाऱ्यांना जगण्याचाच अधिकार नाही. प्रत्येक जिल्ह्यात अडीच- तीन हजार पोलिस फाैजफाटा आहे. एकदा रान पेटलं तर प्रत्येकजण काय अॅंगलने पाहिल, त्यामुळे रान पेटेल ते पेटू नये. त्यासाठी जे कोणी दोषी आहेत, त्याच्या सहकाऱ्यांना सरळ आत टाकावे, अशी मागणी करताना थेट इशाराच छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
सातारा शहरातील एका अल्पवयीन मुलाने 15 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि भारत देशाबद्दल आक्षेपार्ह लिखाण सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या प्रकरणात संबंधित युवकाची रिमांड होम मध्ये रवानगी झाली असून या प्रकरणातील मास्टरमाइंड कोण याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा केली.
छ. उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जातीय सलोखा कायम राहिला. दुर्दैव एवढेच आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि देशाबद्दल गलिच्छ विधान केलं जातंय. यामुळे कारण नसताना जाती जातींमध्ये तेढ निर्माण होत आहे. लोकशाही आबाधित ठेवायचे असेल तर अशी लोकं जगात न राहिलेली बर, कारण नसताना नासक्या एका फळामुळे किड लागते. यासाठी आज पोलीस अधीक्षकांना आम्ही निवेदन दिलय. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यामुळे पोलिसांनी यामध्ये लक्ष घालावं.