विठूराया… बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे : मुख्यमंत्री

पंढरपूर | बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे… सगळी संकट दूर होवू दे, चांगला पाऊस पडू दे. हे राज्य सुजलाम… सुफलाम होवू दे. शेतकरी, कामगार, वारकरी, धारकरी आणि महिला भगिनी हा सर्वच घटक सुखी- समाधानी झाला पाहिजे. पांडुरंगाच्या चरणी शेतकऱ्यांसाठी राज्यातील प्रत्येक माणसांसाठी चागलं दिवस येऊ दे हेच साकडे घातल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.
आषाढी एकादाशीची (Ashadhi Ekadashi) मानाची पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्याच्या पत्नी लता शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुक्काम पोस्ट वाकडीचे भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि सौ. मंगल भाऊसाहेब काळे या मानाच्या वारकरी दांपत्यासह शासकीय पूजा केली. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, गिरीश महाजन, दिपक केसरकर, खा. आनंदराव आडसूळ, आ. समाधान आवताडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात बरेच काही येत- जात होते, परंतु पांडुरंगाच्या आशिर्वादाने सर्वकाही ठिकठाक आहे. अडीच वर्षात थांबलेली विकास कामे थांबली होती, त्यांना चालना देण्याचे काम आम्ही केले आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आरोग्य विभाग आरोग्यशिबीर अत्यंत उत्तमपणे काम करत आहेत. महात्मा फुले योजनेत दीड लाखांपर्यंत उपचार मिळत होते, आता ते 5 लाखापर्यंत मिळणार आहेत. या योजनेसाठी केसरी आणि पिवळी अशी वर्गवारी होती, ती संपवली. आता राज्यातील 12 कोटी जनता 5 लाखापर्यंतचे उपचार घेवू शकतात.