माण- खटावला दुष्काळ जाहीर करा : उपमुख्यमंत्र्याकडे आ. जयकुमार गोरेंची मागणी

सातारा | विशाल वामनराव पाटील
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली, मात्र पूर्वेकडिल माण- खटाव तालुक्यात पावसाने पूर्ण पाठ फिरवली. त्यामुळे या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी काॅंग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रणजिंतसिंह देशमुख यांच्यानंतर आता भाजपचे माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनीही थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. https://x.com/Jaykumar_Gore/status/1715618635807699446?s=20
चालू वर्षी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली असली तरी पिकाला पूरक नियमितता नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागातील कराड, पाटण, वाई, जावली, महाबळेश्वर आणि सातारा येथे पाऊस चांगल्या प्रमाणात झाला. परंतु, शेतातील पिकांना गरज असताना पावसाने पाठ फिरवली. या पावसामुळे कोयना धरण, धोम धरण, कण्हेर धरण, मराठवाडी धरण येथे पाणीसाठा चांगला झाला. मात्र, धरणात साठलेला पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरेल यांची सांशकता आहे. सातारा जिल्ह्यातील माण- खटाव व कोरेगाव तालुक्यातील काही भागात पावसाने पूर्णच पाठ फिरवल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.
माण- खटाव हे तालुके सातारा जिल्ह्यातील दुष्काळी म्हणून ओळखले जातात. याठिकाणी पाणीप्रश्नावर आजपर्यंत राजकारण झाले असून आजही याच मुद्द्यावर होत आहे. अनेक राजकीय नेते आपण पाणीप्रश्न सोडवल्याचे सांगत असून श्रेयही घेत आले आहेत. तरीही चालू वर्षी दुष्काळ जाहीर करण्याची गरज निर्माण झाल्याने पुन्हा दुष्काळी तालुका हा शिक्का अजून पुसला नसल्याचे दिसून येत आहे. माण- खटाव तालुक्यात चारा छावण्या तसेच स्वच्छ पाणी पुरवठा करावा, यासाठी दोन महिन्यापूर्वी माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी केली होती. तर दहिवडी येथे माण- खटाव तालुक्याचे काॅंग्रेसचे नेते रणजिंतसिंह देशमुख यांनी दहिवडी येथे कराड- बारामती रास्ता रोको करत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता सरकार पक्षातील आमदार जयकुमार गोरे यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.