सातारा जिल्ह्यात खळबळ : शेतकरी दाम्पत्याचा पूर्ववैमनस्यातून खून करणारा जेरबंद

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
साताऱ्यातील आंधळी येथे शेतात गेलेल्या पाणी देण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याचा अज्ञाताने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना आज सकाळी 11 वाजता समोर आली होती. त्यानंतर अवघ्या 4 तासात संशयित आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले असून सदरचा खून पूर्ववैमनस्यातून केल्याची कबुली दिली आहे. संजय रामचंद्र पवार (वय- 49 ) व मनीषा संजय पवार (वय- 45) अशी दाम्पत्याची नावे आहेत. या प्रकरणात बाबुराव पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आंधळी (ता. माण) येथील संजय पवार आणि मनिषा पवार हे दाम्पत्य शनिवारी रात्री दहानंतर शेतात पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यास गेले होते. रात्री साधारण 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान अज्ञाताने धारदार शस्त्राने डोके, मान, गळ्यावर वार करून या दाम्पत्याचा खून केल्याची घटना घडली होती. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास परिसरातील शेतकरी शेतात जात असताना पवार पती- पत्नीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहून पाहणी करून घटनेचा पंचनामा केला आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी दहिवडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
खुनाची घटना समोर आल्यानंतर दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक तयार केले होते. सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या चार तासात या खुनातील आरोपी बाबुराव पवार यास जेरबंद करण्यात यश मिळवले. पूर्व वैमनस्यातून बाबुराव पवार याने हा खून केला असल्याची कबुली दिली असल्याची माहिती दहिवडी पोलिसांनी दिली.