कराडच्या ऐतिहासिक व धोरणात्मक विकासासाठी साथ द्या :- पृथ्वीराज चव्हाण
आ. पृथ्वीराज चव्हाण यांना 50 हजारांच्या मताधिक्याने निवडूण आणण्याचा निर्धार

कराड :- महाविकास आघाडीचे सरकार असताना मोठा निधी आणता आला. पण नंतर पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणाला काळिंबा लागेल, अशा गोष्टी भाजपाने केल्या. पक्ष फोडाफोडी करून असंविधानिक सरकार आणलं. पण यावेळी महाराष्ट्रातील जनता भाजपाला त्यांची जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही. आता महाविकास आघाडीचेच सरकार येणार असून काँग्रेस पक्ष मुख्य भूमिका बजावेल. त्यामुळे सत्ता असताना विकास कसा करता येतो हे आपण 2014 ला पाहिलं आहे. आता पुन्हा ती संधी आपल्याला येणार असल्याने कराडचा ऐतिहासिक व धोरणात्मक विकास करण्यासाठी साथ द्या. पुन्हा कराड दक्षिण मतदारसंघात इतिहास घडवूया, असा निर्धार राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी 50 हजारांच्या मताधिक्याने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवडूण आणण्याचा निर्धार केला. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, उत्तरचे अध्यक्ष निवासराव थोरात, अजितराव पाटील – चिखलीकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, पैलवान नानासाहेब पाटील, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, शिवाजीराव मोहिते, अॅ ड. नरेंद्र नांगरे – पाटील, कराडच्या माजी नगराध्यक्षा अर्चना पाटील, माजी उपनगराध्यक्ष फारुख पटवेकर, प्रदीप जाधव, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, गितांजली थोरात, शंकरराव खबाले, रोहित पाटील, नामदेव पाटील, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष ऋतुराज मोरे, नितीन थोरात, एकनाथराव तांबवेकर, डॉ. सुधीर जगताप, उदय आबा पाटील, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष संभाजी चव्हाण, संचालक नितीन ढापरे, श्रीमती इंदिरा जाधव,सर्जेराव गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराडचा आजचा निर्धार राज्यात पोहचला आहे. ही निवडणूक आणि आजचा निर्धार राज्याच्या भवितव्याकरिता महत्वाचा आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कराड दक्षिण मतदारसंघाने आजपर्यंत जपला आहे. १९९१ साली माझ्यावर कराडकरांनी विश्वास दाखवला. त्यामुळे मला तीनवेळा खासदार होता आले. व मला पंतप्रधान कार्यालयापर्यंत मानाचे काम करता आले. मुख्यमंत्री असताना मला कराड दक्षिणमध्ये 1800 कोटीची विकासकामे करता आली. कराड जिल्हा व्हावा या उद्देशाने आधी ज्या विकासाची व प्रक्रियेची गरज आहे अशी मोठी कामे करता आली जी पूर्ण व्हायला काही वर्ष लागली.
https://www.instagram.com/reel/DBMElbEoxoo/?igsh=YzljYTk1ODg3Zg==
अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर म्हणाले, विलासकाका आणि पृथ्वीराजबाबा यांच्यामध्ये वैचारिक संघर्ष झाला. पण कोणतेही व्यक्तिगत मतभेद नव्हते. या निवडणुकीत रयत संघटनेचे कार्यकर्ते एकदिलाने काम करणार असून, पृथ्वीराजबाबांचा विजय नक्की आहे. विरोधकांमध्ये सरंजामशाही व भांडवलदारशाही इतकी भिनली आहे की, त्यांना माणसे विकत घ्यायची आहेत. त्यांच्याकडे वाममार्गाने आलेल्या पैशातून सत्ता हवी आहे. त्यांचा काळ्या पैशाचा अभिमान या निवडणुकीत आपल्याला मोडून काढायचा आहे. माझ्याकडे जबाबदारी व वैचारिक वारसा आला आहे. तो निष्ठेने निभावणार आहे. १९५२ सालापासून आजपर्यंतची कराड दक्षिणची काँग्रेसची परंपरा कायम जपूया. संघटनेत बेरीज – वजाबाकी झाली पाहिजे. त्याशिवाय संघटनेस मजबुती येत नाही. या निवडणुकीत आपल्याला पृथ्वीराज चव्हाण यांची पाठराखण करायची आहे. राज्यात सत्तांतर नक्की आहे. त्यामध्ये कराड दक्षिणचा मोठा वाटा उचलावा लागणार आहे.
बंडानाना जगताप म्हणाले, विरोधी उमेदवार बाहुलीसारखा आहे. चावी दिली की, हा इकडून तिकडून फिरतो. त्यांची पक्षनिष्ठा तपासावी लागते. रेठऱ्यात यशवंतराव मोहिते यांच्यानंतर कोणीही आमदार होणार नाही. तिथे पण महादेव आमदार आहेत. चौथ्यांदा विरोधी उमेदवार अतुल भोसलेंना पराभूत करुया.
मनोहर शिंदे प्रास्ताविकात म्हणाले, ज्यांना रेठऱ्याचा पूल करता आला नाही. त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत. कराड दक्षिणची विधानसभा निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घ्यावी. भानुदास माळी, बंडानाना जगताप, अधिकराव जगताप, अॅ ड. संभाजीराव मोहिते, वहागावचे सरपंच संग्राम पवार, संदीप उर्फ पिंटू शिंदे, चचेगावचे माजी सरपंच दिलीप पवार, आबा गुरव, आबा सुर्यवंशी, अॅ ड. अमित जाधव, प्रा. धनाजी काटकर यांची भाषणे झाली. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले. दिग्विजय पाटील यांनी आभार मानले.
कराड- चिपळूण रेल्वेचा निधी मोदींनी बुलेट ट्रेनला दिला
गेल्या दहा वर्षात भाजपने द्वेषाचे राजकारण करत सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान केले आहे. आजपर्यंत या लोकांनी आपल्याला छळले आहे. महाराष्ट्राचा विकास खुंटला आहे. अनेक मोठे प्रकल्प राज्यातून गुजरातला नेले. हे राज्य सरकारचे अपयश आहे. मुंबईचे आर्थिक विकास केंद्र गुजरातला पळवले. कराड – चिपळूण रेल्वे मार्गाचे सुरेश प्रभूंच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. त्या प्रकल्पाचा निधी मोदींनी बुलेट ट्रेनला वळवला. यातून मोदी महाराष्ट्राचा द्वेष करत असल्याचे दिसते. मुंबई महाराष्ट्राला देण्यासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं. दिल्लीत बसलेले मोदी, शहा व अदानींनी नकळत मुंबई हातात घेतली आहे. मी मुख्यमंत्री असताना पालघर जिल्हा निर्माण केला. त्या जिल्ह्यात होणारी मरीन अकॅडमी मोदींनी द्वारकेला पळवली. त्यावेळेच्या राज्यातील भाजपच्या नेत्यांनी त्यांना विरोध केला नाही, असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी केला.