अहमदनगरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रबीडमराठवाडाराज्यशैक्षणिकसातारा

निषादने पूर्ण केली मनिषाची मनिषा…! : नवोदय, सैनिक स्कूल आणि शिष्यवृत्ती परिक्षेत त्रिवेणी यश

जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कै. रणसिंग सरांचा निषाद मुलगा

# शब्दांकन – सर्वज्ञ मोरे

होतो विजय गड्या, हा नाद पाहिजे बस
सागर तुझ्या मनाचा आबाद पाहिजे बस
कवी अनंत राऊत यांच्या या ओळींना न्याय देत चि. निषाद श्रीराम रणसिंग याने स्वतःच्या अपार कष्टांनी आणि यशप्राप्तीच्या जिद्दीने स्वतःस सिद्ध करून दाखवले आहे. अथांग निरागस मनाचा सागर अबाधित ठेवत एक नाही, दोन नाही तर तब्बल तीन- तीन यशशिखरे एकाच वर्षात पादाक्रांत करून एक इतिहासच रचला आहे !

चि. निषाद याने वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी महाराष्ट्रभरातील अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असलेल्या जवाहर नवोदय विद्यालय येथे निवड, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत 7 वा क्रमांक आणि सैनिक स्कूल लेखी परीक्षा पात्र होऊन यशाचा त्रिवेणी संगम घडवून आणला आहे. या त्याच्या यशप्राप्तीमध्ये आई मनिषा रणसिंग यांचे मनोधैर्य, आजी हिराबाई रणसिंग (बाई) यांचे संस्कार आणि विशेषतः वडील कै. श्रीराम रणसिंग यांचे शुभाशीर्वाद निषादसाठी प्रेरणादायी ठरले.

दीड वर्षांपूर्वी चि. निषादच्या वडिलांचे अपघाती निधन झाले आणि त्या श्रीरामाच्या जाण्याने रणसिंग कुटुंबाचा जणू रामाविना वनवास सुरू झाला. परंतु, या परिस्थितीतही वडिलांची शिक्षण विषयक तत्वे मनाशी बाळगून स्वतः प्राथमिक शिक्षिका असलेल्या आईच्या आशीर्वादाने चि. निषाद याने इ. 5 वी तील या तीनही स्पर्धा परीक्षांच्या तयारीस सुरुवात केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किरपे (ता. कराड) येथे प्रवेश घेऊन वर्गशिक्षक राजेश मोरे सर यांच्या सहकार्याने व सुशांत देसाई सर यांच्या मार्गदर्शनाखाली निषादने आई- वडिलांच्या स्वप्नपूर्तीची स्वप्ने रंगवली व अखेर अथक परिश्रमांती ती सत्यात उतरवली.

आता चि. निषाद याने जवाहर नवोदय विद्यालय सातारा येथे प्रवेश घेतला असून पुढील संपूर्ण माध्यमिक शिक्षण तो तेथेच पूर्ण करणार आहे. निषादच्या आयुष्यातील या यशप्राप्तीनंतर त्याच्या शैक्षणिक जीवनाला मिळालेली कलाटणी अनेक होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरत आहे. चि. निषाद व संपूर्ण रणसिंग कुटुंबाचे जि. प. सातारा तसेच पं. स. कराड शिक्षण विभाग येथील अधिकारी, जि. प. प्राथमिक शिक्षक, पालक, तसेच सर्वच स्तरांतून प्रचंड कौतुक होत आहे. आपल्या लेकाच्या कौतुक सोहळ्याकडे पाहताना आई मनिषा रणसिंग आणि आजी हिराबाई रणसिंग यांच्यासह सर्वच कुटुंबीयांना आनंदाश्रू अनावर होत आहेत. याच दरम्यान सुरू झालेल्या रिमझिम श्रावणधारा वडील कै. श्रीराम रणसिंग यांच्या आनंदाश्रूंची जाणीव करून देत असाव्यात, असे म्हणण्यास हरकत नाही.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker