कोयना धरणात 15 दिवसात अवघा साडेतीन टीएमसी पाणीसाठा वाढला : शेतकरी अडचणीत

– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला असल्याने कोयना धरण केव्हा भरणार याकडे शेतकऱ्यांसह नदीकाठच्या गावच्या नजरा लागून राहिल्या आहेत. कोयना धरण परिसरात जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात धुवांधार पावसाने हजेरी लावल्याने धरणात मोठा पाणीसाठा झाला. मात्र, गेल्या 15 दिवसात अवघा 3. 5 टीएमसी पाणी वाढले आहे. आज सकाळपासून कोयना धरण परिसरात पावसाने रिमझिम सुरू केली आहे. कोयना धरणात सध्या 84. 17 टीएमसी पाणीसाठा आहे.
कोयनेत 84. 17 टीएमसी पाणीसाठा…
कोयना धरणात रविवार (दि. 20) सकाळी 8 वाजेपर्यंत 84.17 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासात कोयनेला- 18 मिलीमीटर, नवजा- 38 मिलीमीटर व महाबळेश्वरला- 66 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला- 3311, नवजा- 4715 आणि महाबळेश्वरला- 4440 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात प्रतिसेंकद 2 हजार 586 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. कोयना धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.
खटाव- माण तालुक्यात दुष्काळ
कोयना धरणात दि. 5 आॅगस्ट रोजी 80. 67 टीएमसी पाणीसाठा होता. तर आज रविवार दि. 20 रोजी 84.17 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाचा गेल्या 15 दिवसात दडी मारल्याने अवघा साडेतीन टीएमसी पाणीसाठा धरणात वाढला आहे. तर माण- खटाव, कोरेगाव उत्तर भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. खटाव- माण तालुक्यातून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात असून जनावरांच्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली जात आहे.