वहागावचा सरपंच लय भारी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी घेतला ‘हा’ उपक्रम हाती

कराड । येत्या काही दिवसांत शाळा सुरू होणार आहेत, अशावेळी बाजारपेठेत शालेय साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे. परंतु महागाई वाढल्याने अनेक गरिब विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहतात. तसेच काहींना वह्या मिळत नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी वहागांव (ता. कराड) येथील सरपंच संग्राम पवार यांनी ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
वहागांव येथील सरपंच संग्राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विकास कामे सुरू आहेतच. मात्र, गावातील मुलांचा शहरात न जाता गावातील शाळा कशा अद्यावयात बनविल्या जातील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अंगणवाडी असो की जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थ्यांची भेट अन् शिक्षकांची मागणी पूर्ण करण्याकडे सरपंच लक्ष देत असतात. आता काही दिवसांत शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी शिकला पाहिजे, यासाठी त्याची मूळ गरज म्हणजे शालेय साहित्य होय. तेव्हा या सर्वांचा विचार करून १० जून ते २० जून या कालावधीत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘ना नफा, ना तोट’ या तत्वावर शालेय साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
लोकप्रतिनिधींनी शाळांना भेटी द्याव्यात : संग्राम पवार
ग्रामीण भागात आजही जिल्हा परिषदेत शिकणारा विद्यार्थी स्पर्धेत टिकतो. त्यासाठी गावच्या राजकारणांवर लक्ष दिले जाते, त्यातील थोडे जरी आपल्या भावी पिढीच्या शिक्षणांवर दिले पाहिजे. अनेकदा गावचे लोकप्रतिनिधी यांनी शाळांना भेट दिल्यास प्रश्न समजतात अन् त्याची उत्तरेही मिळतात. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे स्पर्धेत कमी पडताना दिसतो, त्यामुळेच आम्ही यावर्षी शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सरपंच संग्राम पवार यांनी सांगितले.