जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी समाजाने मदतीचा हात द्यावा : आबासाहेब साठे

कराड – ग्रामीण भागातील शाळा टिकण्यासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी आजही सामाजिक दातृत्वाची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांत विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात पुढे नेण्यासाठी युवा उद्योजक सुनिल बामणे यांनी केलेली मदत लाखमोलाची ठरेल. शहरातील इंग्रजी माध्यमांची फी आजही अनेक पालकांना परवडणारी नसल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा दर्जा उंचावण्यासाठी समाजाने मदतीचा हात देण्याचे आवाहन जिल्हा परिषद दक्षिण तांबवे शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब साठे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या दक्षिण तांबवे शाळेस युवा उद्योजक, क्रिडाप्रेमी सुनिल बामणे यांनी शैक्षणिक साहित्यासाठी रोख 15 हजार रूपयांची मदत केली. यावेळी सरपंच साै. शोभाताई शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश मोगरे, सदस्य सुजय पाटील, विशाल पाटील, यशवंत कुलकर्णी, स्वाती पाटील, शिक्षक सतिश सोनवणे, मनिषा साठे, वैभव शिंदे आदी उपस्थित होते.
सुनिल बामणे म्हणाले, मी एक आज उद्योजक असलो तरी मीही जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकलो आहे. आज अनेक शाळा बंद पडत आहेत, दर्जा खालावलेला पहायला मिळतो. मात्र, दक्षिण तांबवे शाळा गुणवत्तेत तालुक्यात आघाडीवर असल्याने ग्रामीण भागातील गरीब मुलांसाठी मदत करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या दक्षिण तांबवे शाळेस मदतीसाठी मी सदैव तत्पर असेन.