सत्यजित पाटणकर अन् कट भाषण : पाटण तालुक्यातील राजकारण, बंड, दंड अन् टक्केवारी

विशाल वामनराव पाटील | पाटण
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत गुढे- ताळमावले (ता. पाटण) येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. अजित पवारांचे भाषण राज्यातील आणि पाटणमधील राजकीय, सामाजिक प्रश्नावर झाले. परंतु पाटणमधील पाटणकर आणि देसाई घराचे संबध, शंभूराज देसाई यांची हुकुमशाही, प्रशासनावरील दबाव, पाटणचे जुने- नवे राजकारण आणि राष्ट्रवादी (पाटणकर गट) कार्यकर्त्यांची गोची या सर्वच विषयावर जोरदार भाषण केले.
पालकमंत्र्यांना पैशाची आणि सत्तेची मस्ती
पाटण बाजार समिती स्थापन झाल्यापासून पहिलीच वेळ आहे, अल्पशा मतांनी बाजार समिती गेली. थोडं आपण गाफील होतो. काही ठिकाणी पैशाचा, सत्तेचा वापर झालेला आहे, हे नाकारू शकत नाही. महाराष्ट्रात सत्तेत अशी मंडळी बसलेली आहे. ज्यांची आज पात्रता नाही, अशी मंडळी पालकमंत्री म्हणून बसलेली आहे. या मंडळींना पैशाची आणि सत्तेची एवढी मस्ती चढलेली आहे. प्रशासनाला दाबून कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. विकासकामे बंद पाडण्याचे काम चालू झालेलं आहे. तरीही आपण आज तग धरून राहिलेलो आहे. राष्ट्रवादी पक्षातील शेवटच्या मावळ्यापर्यंत आपला मावळा खिंड लढवेलं, कमी पडणार नाही याची मला खात्री आहे.
पाटण तालुक्यात 1980-83 साली बंड, आताचे गद्दार
आपला जन्म संघर्षातून झालेला आहे. 1980-83 साली या तालुक्यात नवीन राजकीय समीकरण स्थापन केले. गेल्या 35 वर्षात शरदचंद्रजी पवार यांच्या पाठीमागे एकच नेता प्रामाणिकपणे काम केलेलं आपण पाहतोय, ते म्हणजे विक्रमसिंह पाटणकर हे होय. पाटण तालुक्यात प्रामाणिकता राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्यात पहायला मिळते. आता महाराष्ट्रात गद्दारी आणि 50 खोके शिवाय काही पहायला मिळत नाही. सध्या ही मंडळी म्हणतात आम्ही बंड केले, बंड झाले ते 1980-83 साली. पोट भरलेलं असताना, राज्यमंत्रीपद असताना 5 खाती असताना. स्वताः चा नेता आजारी असताना पाठीत खंजीर खुपसून खोक्याच्या माघारी पळालीत अन् गद्दारी केली.
तुमचे नाशिकचे आजोबा ज्या वाड्यात आले होते, तेथे तुम्ही दंड थोपटण्याचे पाप केले
गेल्या 3 वर्षात मार्केट कमिटीचे 2 पेट्रोल पंप झाले आहेत, आता त्यावर तुमचे बोर्ड लावू नका. एवढीतरी सभ्यता पाळा. राजकारणात सभ्यता काय आहे, हे त्यांनी या निवडणुकीच्या विजयी मिरवणुकीत दाखवून दिले. वाड्यासमोर येवून निर्लज्जपणे दंड थोपटण्याचे काम केले आहे. तुम्ही दंड थोपटताय कुणाच्या समोर, ज्या वाड्यातील माणसांनी तुमच्या सर्व परिवाराला राजकारणात वेळोवेळी साथ दिलेली आहे. तुमचं वय बसत नव्हते, त्यावेळेला तुमचे नाशिकचे आजोबा याच वाड्यात आले होते. तेथेच समेट झाला, अन् तुम्ही चेअरमन झाला. संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते. परंतु पवार साहेबांच्या सांगण्यावरून पाटणकर दादांनी माघार घेतल्याने तुम्ही मंडळी वाचला. एवढी मदत केलेल्या लोकांच्यासमोर येवून दंड थोपटण्याचे पाप तुम्ही केलेलं आहे. सत्तेची मस्ती आणि पैशाची गुर्मी ही आपल्याला कारखान्याच्या कार्यक्रमात दिसून आलेली आहे.
अजित दादांना मुख्यमंत्री झालेलं पहायचं आहे, त्यासाठी पाटणला आमदार राष्ट्रवादीचा पाहिजे
साईगडे गावचा कार्यकर्ता त्याच्याच पार्टीचा स्टेज डेकोरेशन करता शाॅक लागून मयत पावला. तरीसुध्दा त्याचठिकाणी त्यांनी निर्लज्जपणे तमाशाचे फड भरवला. तेव्हा पाटण तालुका कुठे चालला आहे. पक्ष वाढीसाठी हातात हात घालून पुढे जावूया तसेच अजित दादांना आणताना आपली मान कुठे खाली गेली नाही पाहिजे. अजित दादांना मुख्यमंत्रिपद झालेलं पहायचं आहे. त्यासाठी पाटण तालुक्यात आपला आमदार झाला पाहिजे.
पाटण तालुक्यात टक्केवारीचे गणित
प्रशासनावर एवढा दबाव आहे की, अधिकारी कुठल्या तरी मंत्र्यांचे कार्यकर्ते असल्यासारखे वाटते. पाटण तालुक्यात टक्केवारी गणित माणसाच्या तोंडात बसलेलं आहे. आता तयार झालेला रस्ता पावसाळा झाल्यानंतर बघायला मिळत नाही. आम्ही भ्रष्टाचार उघडकीस आणू. महिलांनी मंडळांनी उठाव केला पाहिजे. शरद पवार आणि अजित पवारांनी मंजूर केलेली धरणे आज २० वर्ष झाले अपूरी आहेत. पुर्नवसानाचा प्रश्न मार्गी लागला नाही. कॅनालचे काम अपूरी आहे. साईगडे आणि मालदनचा बंधारा रामराजे नाईक- निंबाळकर जलसंपदा मंत्री असताना झाले आहेत. आता संघर्षाची वेळ आहे, आता पक्षबांधणी करूया.