कण्हेर धरणात पोहताना विद्यार्थी बुडाला

सातारा | अक्षय तृतीया व रमजान ईदनिमित्त कॉलेजला सुट्टी असल्याने मित्र गेले धरणात पोहायला अन् दुर्देवी घटना घडली. सातारा येथे वास्तव्यास असलेला परंतु मूळचा अकलूजचा 23 वर्षीय विद्यार्थी कण्हेर धरणात बुडाला. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, रायगाव (ता. जावली ) येथील छाबडा कॉलेजमधील स्वराज संभाजीराव माने-देशमुख (वय-२३, रा. अकलूज, सध्या- मंगळवार पेठ, सातारा) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. शनिवारी (दि.22) रोजी 10 मित्र सुट्टी असल्याने धरणावर पोहण्यास गेले होते. दरम्यान, स्वराज हा लांब अंतर धरणातील पाण्यात पोहत गेला असता, त्याला दम लागून तो पाण्यात बुडाला. स्वराज बुडाल्याचे समजल्यावर त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. खोल पाण्यामध्ये बुडालेल्या स्वराजला पाण्याबाहेर काढण्यासाठी छ. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. परंतु, धरणात लांब पाण्यामध्ये स्वराज बुडाल्याने वाचवता आले नाही.
स्वराज हा छाबडा येथील कॉलेजमध्ये बीएचएमएसच्या दुसऱ्या वर्षांमध्ये शिकत असून तो सातारा येथे राहत होता. त्याच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ आहे. या घटनेची माहिती मिळताच धरण परिसरातील नागरिकांनी धरणावर गर्दी केली आहे. याबाबतची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.