स्वाभिमानीने सह्याद्री कारखान्याची ऊस वाहतूक रोखली : उद्या चक्काजाम आंदोलन

कराड | ऊस दराबाबत मुंबईत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सहकार मंत्री यांच्यातील बैठक निष्फळ झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कराड तालुक्यातील मसूर येथे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक स्वाभिमानीने रोखली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उद्या बुधवारी दिनांक 23 रोजी पुणे- बेंगलोर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्या अगोदर नवीन प्रस्ताव स्वाभिमानी कडून कारखानदारांना तसेच सहकार मंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी आज रात्री आठ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. मात्र, त्या अगोदरच कराड तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, उपाध्यक्ष दादासाहेब यादव, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे कराड उत्तरचे अध्यक्ष प्रमोद साळुंखे कराड दक्षिणचे अध्यक्ष बापूसाहेब साळुंखे पक्षाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र साळुंखे उत्तम साळुंखे यांच्यासह प्रहार संघटनेचे मनोजकुमार माळी यांनी ऊस वाहतूक करणारी वाहने रोखली आहेत.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखान्यांकडे वारंवार ऊस दर जाहीर करावा, अशी मागणी होती. परंतु, साखर कारखाने ऊसदर जाहीर करत नसल्याने राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको केला. या पार्श्वभूमीवरती आज मुंबई येथे सहकार मंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.