मोबाईलमुळे जग जवळ, पण लेकरं मात्र आई-बापापासून दुरावत आहेत : इंद्रजीत देशमुख
शिवाजी विद्यापीठ आणि शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमाला

कराड | स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक थोर विभूतींनी मोठं मोठी स्वप्न पाहिली. अनेकांनी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळविले, पण अलीकडच्या 75 वर्षात आमची स्वप्न मात्र खुजी झाली. आत्मकेंद्री राहिली. मी आणि माझे कुटुंब बस एवढेच! त्यात संस्कारांचे पतन आणि समाजभान देखील आम्ही हरपत चाललो आहोत. तंत्रज्ञानाने जग खूप जवळ आलं, पण लेकरू मात्र आई-बापापासून खूप दूर चाललं आहे. भावनाशून्य शिक्षण हे शिक्षणाचे ध्येय कधीच नव्हते. पण आमचा तरुण या भाव- भावनांपासून देखील दूर चालला आहे. कुटुंब व्यवस्था देखील हा मोबाईल मोडकळीस आणतो की काय, अशी भीती आता ज्येष्ठांना सतावू लागली आहे. तेव्हा पोरांनो माघारी फिरा, असे भावनिक आवाहन शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत ते प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे होते. तर प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्र. कुलगुरू डॉ. व्ही. एन. शिंदे, माजी सहसचिव प्रशासन प्राचार्य एन. जी. गायकवाड, प्राचार्य एस. के. कुंभार, प्राचार्य आर. के. भोसले, सातारा जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य अरुण कुंभार, माजी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पाटील, माजी प्राचार्य डॉ. सुभाष शेळके तसेच संस्थेतील आजी- माजी पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंद्रजीत देशमुख पुढे म्हणाले, भारतातील तरुणांचे मोबाईल रोज सरासरी 13 ते 14 तास चालू असतात. सरासरी झोप तीन तासांवर येऊन थांबली आहे. जंगली रमी रोज 20 ते 25 आत्महत्या घडवून आणत आहे. सेल्फी दररोज 30 ते 35 आत्महत्या करायला लावत आहे. नेटफ्लिक्सला तरुणांची झोप संपवायची आहे. तरुणांच्या डोक्यात हिंसा घालायची आहे. व्हाट्सअॅप, फेसबुक विद्यापीठाने तर आमची पोरं संपवली आहेत. दुसऱ्या बाजूला पालकांनी देखील घरात येणारा पैसा पारदर्शक आणायला हवा तरच तेथे मूल्यांची उंची वाढलेली असेल. तेव्हा समाजभान असणाऱ्या व्यक्ती आपण घडवूया. तरच जग वाचेल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शोभा लोहार यांनी तर आभार प्रा. सुरेश रजपूत यांनी मानले.