काले, उंडाळे आठवडी बाजारात चोरट्यांचा मोबाईलवर डल्ला : पोलिस हतबल

कराड- काले गावच्या आठवडी बाजारात चोरट्यांनी मोबाईलवर डल्ला मारला आहे. गेल्या महिन्याभरात जवळपास 15 हून अधिक मोबाईल चोरीला गेले असून मंगळवारी दि. 7 रोजी 3 मोबाईल चोरीला गेले. चोरट्यांच्यापुढे पोलिसही हतबल झाल्याचे पहायला मिळत असून पोलिस नागरिकांना म्हणतायत तुम्हीच टीम करा अन् चोरट्यांचा बंदोबस्त करा. या पोलिसांच्या भूमिकेमुळे आता दाद कोणाकडे मागायची अशी परिस्थिती काले, उंडाळे भागातील लोकांची झाली आहे.
काले येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरत असतो. या बाजारात सायंकाळी 4 ते 6 यावेळेत लोकांची मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेवून चोरटे मोबाईलवर डल्ला मारत आहेत. गेल्या महिन्याभरात काले आणि उंडाळे बाजार पेठेतून अनेकांचे मोबाईल चोरीला गेले. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली, परंतु पोलिस दाद घेताना दिसत नाहीत. तसेच नागरिकांनीच ग्रुप तयार करून चोरट्यांवर लक्ष ठेवावे, असा अजब सल्ला दिला जात आहे. पोलिसांच्या कुचकामी भूमिकेमुळे चोरट्यांचा अद्याप थांगपत्ता लागला नसून चोरट्याचे धाडस वाढताना पहायला मिळत आहे. आज काले बाजारपेठेत 2 ते 3 मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगितले जात आहे. तेव्हा पोलिस या चोरट्यांचा बंदोबस्त करणार की बघ्याची भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.
चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा रूपेश पाटील
आज मी बाजारपेठेत कामानिमित्त गेलो होतो. यावेळी अगदी काही वेळातच माझा नवीनच 14 हजारांचा मोबाईल चोरीला गेला. कालेच्या आठवडी बाजारातून मोबाईल चोरीला जाण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. केवळ बाजार भरल्यानंतर चोरी होत असल्याने चोरटे मोबाईल टार्गेट करताना दिसत असून पोलिसांनी बंदोबस्त करावे, असे काले येथील रहिवाशी रूपेश पाटील यांनी मागणी केली आहे.