मलकापूरात आर्थिक व्यवहारातून ट्रकखाली सापडून ट्रकमालक ठार

कराड | आर्थिक व्यवहारातून जबरदस्तीने ट्रक नेताना आडवा आलेला ट्रकमालक ट्रकखाली चिरडून ठार झाला. मलकापूर येथील गंधर्व हॉटेल शेजारच्या मोकळ्या जागेत दुपारी दोनच्या सुमारास घटना घडली. विष्णू शिवाजी हजारे (वय- 35, रा. अहिल्यानगर) असे ठार झालेल्याचे नाव आहे. या घटनेनंतर बघ्यांची गर्दी झाली होती. या प्रकरणात रेठरे खुर्द येथील अक्षय गावडे याला लोकांनी पळून जाताना पकडले असून अन्य लोक पळून गेले आहेत.
घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ः पुणे- बेंगलोर महामार्गावर हॉटेल गंधर्व पॅलेस शेजारी मोकळ्या जागेत पार्किंग तळ आहे. तेथे विष्णू हजारेचे काही वर्षांपासून जयहिंद मोटर गॅरेज आहे. गॅरेज व्यवसायासोबत ट्रक असल्याने टायरची देवाणघेवाण सुरू होती. रविवारी दुपारी विष्णू हजारे गॅरेजमध्ये काम करत असताना टायरच्या व्यवहारातील पैसे मागण्यासाठी रेठरे खुर्द येथील अक्षय गावडे, रणजीत पाटीलसह पाचजण तेथे आले. टायरच्या व्यवहारातून त्याच्यात बाचाबाची सुरू असतानाच अक्षय गावडेने पैसे दे, नाहीतर ट्रक ओढून नेतो, असे म्हणला. अक्षयने ट्रकमध्ये (एमएच- 10- ए डब्ल्यू- 7574) चढून चालकाच्या जागी बसून ट्रक सुरू केला. त्याचवेळी ट्रक कसा नेहतो म्हणत त्याला आडवत हजारे ट्रक बंद होण्यासाठी खाली असलेला स्विच बंद करण्यासाठी चाकाजवळ गेले, तोपर्यंत गावडेने ट्रक सुरू केला होता. ट्रक पुढे येताच हजारेंच्या डोक्यावरून गेला, चाकाखाली आल्याने तो जागीच ठार झाला.
या घटनेची माहीती मिळताच पार्किंग तळ मालक पोलिस पाटील प्रशांत गावडेसह नागरिक घटनास्थळी धावले. घटनेनंतर अक्षय गावडेसह सारेच तेथून पळून गेले. परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधानन राखत पाठलाग करत अक्षयला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव विभूते, फौजदार राजु डांगे, फौजदार आबा जगदाळे, हवालदार धिरज चतूर यांच्यासह कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवून दिला. घटनेची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.