राष्ट्रवादीत प्रवेश : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाला सोडचिठ्ठी

पाटण । पाटण तालुक्याच्या विकासासाठी परिवर्तन हा एकच आता पर्याय आहे. गटबाजी व भ्रष्टाचाराची उन्मत्त सत्ता उलथवून टाकण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस हा एकमेव पर्याय आपल्या समोर आहे. पाटण तालुक्याचा खुंटलेला विकास साधायचा असेल तर राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा बॅंकेचे संचालक व पाटण तालुक्याचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर सांगितले.
उधवणे (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी आज पाटण येथे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी देसाई गटाचे पाटण तालुका रहिवासी संघाचे उपाध्यक्ष- मानखुर्द व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रमुख अरुण साळुंखे यांनी देसाई गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी स्वागत केले. यावेळी यशवंत केशव साळुंखे, शामराव दगडु साळुंखे, माजी सरपंच पांडुरंग साळुंखे, शंकर साळुंखे, आनंद साळुंखे, सिताराम पाटील, रामचंद्र साळुंखे, बाळू पाटील, बाळू साळुंखे व ग्रामस्थ उपस्थित होते.
नुकतेच काही दिवसांपूर्वी उधवणे येथील माजी सरपंच पांडुरंग साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ आणखी एका राजकीय पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने उधवणे येथे देसाई गटाला मोठे खिंडार पडले आहे. अरुण साळुंखे हे उधवणे गावातील देसाई गटाचे एक मातब्बर नेते म्हणून ओळखले जात. त्याचबरोबर त्यांचे मुंबई येथे मोठे राजकीय वलय असल्याने देसाई गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.