माळवाडी येथील दूधाच्या सांडपाण्याचा बंदोबस्त न केल्यास 31 तारखेला टाळे ठोकण्याचा इशारा

मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
माळवाडी (ता. कराड) येथील आकाशदीप दूध संकलन केंद्राच्या व्यवस्थापनाने सर्व नियम धाब्यावर बसवत प्रकल्पाचे केमिकल मिश्रित दूषित सांडपाणी सोडल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांना, पिकांना त्रासदायक ठरत आहे. आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित पाण्यासंदर्भात आकाशदीपचे व्यवस्थापक प्रकाश लक्ष्मण इंगवले यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. येत्या ३१ जुलै २०२३ अखेर डेअरी मालकाने सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास १ ऑगस्ट रोजी गेटला टाळे ठोकून आंदोलन करणार असल्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी विजयसिंह गणपतराव जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, दत्तात्रय जाधव, किशोर जगदाळे, जयवंत जगदाळे, सुमित शहा, प्रवीण शहा, सुभाष शहा, राहुल शहा, कुणाल शहा, शुभम जगदाळे, रमेश निकम, सतीश जाधव, संभाजी जाधव, दत्तात्रय जाधव, राहुल शेटे, जगदीश शेटे, सयाजी जाधव, तानाजी जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.
याबाबत शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रिसवडचे प्रकाश लक्ष्मण इंगवले यांच्या मालकीचे माळवाडी हद्दीत आकाशदीप दूध संकलन केंद्र आहे. या ठिकाणी दूध पिशव्या व अन्य प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचा प्रकल्प कार्यरत आहे. दुधाची भांडी धुतल्यानंतर निघणारे दुग्धमिश्रित पांढऱ्या रंगाचे केमिकलयुक्त सांडपाण्याचा पाईपलाईनद्वारे ओघळीत विसर्ग केला आहे. हे सांडपाणी कॅनॉलच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मिश्रित होऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये पर्क्युलेशन होऊन उतरत आहे. हे पाणी प्यायल्याने अनेकांना घशाचा त्रास जाणवू लागला आहे. पोटाचा आजार व जनावरांना त्रास होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे माणसांच्या व जनावरांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला असून जमिनीचा पोतही बिघडत आहे. वास्तविक कोणत्याही प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करून ते सांडपाणी उघड्यावर न सोडता सरकारी अथवा कोणाच्या खाजगी हद्दीत न सोडतात. त्याचे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण न होऊ देता त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे असते. मात्र मनमानी करीत प्रकाश इंगवले यांनी सर्वनियम धाब्यावर बसवले आहेत. संबंधितांनी सांडपाण्याची योग्य विल्हेवाट ३१ जुलै पर्यंत आपल्या पातळीवर लावावी अन्यथा १ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
२०११ सालापासून पाठपुरावा….
मसूरचे शेतकरी सुभाष पोपटलाल शहा यांनी २०११ साली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपप्रादेशिक अधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार कराड यांना आकाशदीप दूध संकलन केंद्राने दूषित सांडपाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. पण प्रकल्प मालकावर कसलीही कारवाई झाली नसल्याने संबंधितांमध्ये मिलीभगत झाली असावी असा संशय त्यांनी व्यक्त केला.