बहिणीकडे राखी बांधायला जाताना भावासह त्याच्या पत्नीचा अपघातात जागीच मृत्यू : साताऱ्यातील सालपे घाटातील दुर्घटना

सातारा (हॅलो न्यूज)- सातारा जिल्ह्यातील फलटण- कोरेगाव हद्दीवरील सालपे घाटात रक्षाबंधनाला जाता न आल्याने दुसऱ्या दिवशी आपल्या बहिणीकडे राखी बांधायला निघालेल्या भावाचा आणि त्याच्या पत्नीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. सालपे घाटात शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भरधाव मालट्रकने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह पसार झाला. तानाजी खंडू खराडे (वय ५१) आणि रेखा तानाजी खराडे (४९, रा. तडवळे संमत कोरेगाव, ता. कोरेगाव) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी खराडे हे पत्नी रेखा यांच्यासह मोटारसायकलवरून (एमएच ११ सीएफ ६८५४) निघाले होते. निंबोडी येथील आपल्या बहिणीकडे खराडे दाम्पत्य रक्षाबंधनासाठी निघाले होते. सालपे घाट उतरत असताना घाटाच्या उतारावर मालट्रक (एमएच १२ एसएक्स ६३७७) वरील चालकाने वाहन भरधाव चालवत दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
शुक्रवारी रक्षाबंधनाला जाता आले नाही म्हणून शनिवारी…
तानाजी खराडे हे चालक म्हणून खासगी वाहनावर काम करत होते. शुक्रवारी त्यांना बाहेरगावी जावे लागल्यामुळे रक्षाबंधनाला जाता आले नव्हते. त्यामुळे शनिवारी ते पत्नी रेखाच्या सोबत निंबोडी (ता. फलटण) येथील बहिणीकडे राखी बांधायला निघाले होते. मात्र, सालपे घाटात भीषण अपघाताने त्यांना जीव गमवावा लागला. त्यांच्या पश्चात मुलगा व विवाहित मुलगी आहे.



