मसूर येथील एकाचा विजेच्या तारेचा धक्का लागल्याने दुर्देवी मृत्यू
मसूर प्रतिनिधी । गजानन गिरी
मसूर (ता. कराड) येथील संदीप बाजीराव वायदंडे (वय- 39) यांचे विजेच्या तारेला धक्का लागून दुर्दैवी अंत झाला. सदरची घटना सोमवारी सकाळी आठच्या दरम्यान घडली. येथील सामाजिक कार्यकर्ते व मातंग समाजाचे मार्गदर्शक बाजीराव वायदंडे यांचा संदीप हा कनिष्ठ चिरंजीव होता.
शहापूर येथे त्यांचे दुकाना शेजारील सीमा मंद्रुळकर यांनी बांधलेल्या नवीन घराच्या वस्तूशांतीला घराला तोरण बांधण्यासाठी संदीप गेला होता. तोरण बांधत असताना घराजवळून गेलेल्या विद्युत वाहक तारेला धक्का लागला. धक्का लागल्याने बाजूला जोरात फेकला गेला. त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. मातंग समाजातील अत्यंत कष्टाळू सतत हसतमुख निर्व्यसनी विशेषता सर्वांच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्त्व म्हणून संदीप ओळखला जात होता. त्याचा मित्रपरिवारही मोठा आहे.
संदीप वायदंडे केटरिंग व भाजीपाला व्यवसायासह रिक्षावर त्याच्या कुटुंबाचा तो चरितार्थ चालवत होता. त्याच्या आकस्मित जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. संदीपच्या आकस्मित जाण्याने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्याच्या अंत्ययात्रेला राजकीय, सहकार, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील पदाधिकारी, मान्यवर मित्र परिवार, नातेवाईक, ग्रामस्थ सहभागी झाले होते.