आंबेघर भूस्खलन…… : तत्पर, संवेदनशील माजी पालकमंत्री आ. बाळासाहेब पाटील

– विशाल वामनराव पाटील
आकाशातून जोरदार पावसाच्या सरी अन् ती काळीकुट्ट 21 जुलै 2021 ची काळरात्र पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी, मिरगांव, ढोकावळे या गावांमध्ये भूस्खलन झाले. अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. नैसर्गिक आपत्ती कोसळली होती. गावे दुर्गम असल्याने नुकसानीची तीव्रता समजत नव्हती. याबाबतची माहिती जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांना समजताच ते 22 जुलै रोजी सकाळी लवकर प्रशासनासमवेत घटनास्थळी जाण्यासाठी निघाले. जोराचा पाऊस, घटनास्थळी जाण्याच्या मार्गावर भरपूर ओढे, नाल्यांचे पाणी वाहात होते. रस्ते खचले होते. त्यामुळे एनडीआरएफच्या तुकडीलाही त्याठिकाणी पोहोचण्यात अडचणी येत होत्या. परिसरातील स्थानिक नागरिक बचावकार्य करीत होते. 22 जुलै रोजी आमदार बाळासाहेब पाटील घटनास्थळी जाण्यासाठी निघाले.
पक्का रस्ता नसल्याने आमदार बाळासाहेब पाटील यांनी पायी चालत जाण्याच्या निर्णय घेतला. पालकमंत्री या नात्याने आपदग्रस्तांना तातडीने शासकीय मदत मिळावी, यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचा निर्धार त्यांनी केला होता. पायवाटेवर चिखल व पाण्यातून डोंगर कपारीतून, वाट काढत जवळपास 5 किलोमीटरचा पायी प्रवास करत पालकमंत्री घटनास्थळी पोहोचले. एनडीआरएफचे बचावकार्य सुरू होते. संपूर्ण गांव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. बाहेरगावी असणारे नातेवाईक त्याठिकाणी दाखल झाले होते. त्यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
आमदार बाळासाहेब पाटील तेथे पोहोचून नातेवाईकांना धीर दिला. मायेचा आधार दिला. पालकमंत्रीच दाखल झाल्याने शासकीय यंत्रणाही गतीने कामाला लागली. राज्यकर्ते म्हणून जनतेप्रती असणारी बांधिलकी जपत आमदार बाळासाहेब पाटील यांनी राजधर्माचे पालन केले. पालकमंत्र्यांच्या या तत्परतेची प्रशंसा झाली. कोणतीही घटना असो आमदार बाळासाहेब पाटील नेहमी संवेदनशील असतात. पालकत्व काय असते हे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या रूपाने त्याठिकाणी पाहायला मिळाले. या घटनेला आज दि. 23 जुलै 2023 रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. त्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण आदरांजली…