सातारा जिल्हा प्लास्टिक मुक्तीसाठी योगदान द्या : ज्ञानेश्वर खिलारी
स्वच्छता ही सेवा पंधरवडा : हजारमाची येथे लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता अभियान

कराड | स्वच्छता ही सेवा” या पंधरवड्या अंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी श्रमदान करून विशेष स्वच्छता अभियान राबवले जात आहे. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी कराड तालुक्यात हजारमाची येथे स्वतः तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्यासह श्रमदान केले.
यावेळी ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी यांचा स्वच्छता दूत म्हणून सत्कार केला. या मोहिमेत गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सहाय्यक गट विकास अधिकारी विजय विभुते, उपअभियंता अभिजीत जोशी, तालुका आरोग्य अधिकारी, लघुपट बंधारे उप अभियंता, बांधकाम उप अभियंता, कृषी अधिकारी, विस्ताराधिकारी ग्रामपंचायत विकास स्वामी, दिपसागर पोतदार, सरपंच विद्याताई घबाडे, उपसरपंच प्रशांत यादव, ग्रामविकास अधिकारी नामदेव चिंचकर, जिल्हा तज्ञ राजेश भोसले, ऋषिकेश शीलवंत, विस्तार अधिकारी पंचायत विकास, गट संसाधन केंद्राचे कर्मचारी पूनम पाटील ज्योती आंबवडे यांच्या सह, आरोग्य कर्मचारी महिला बचत गट सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ज्ञानेश्वरी खिलारी म्हणाले,” अधिकारी, नागरिक, लोकप्रतिनिधी, कर्मचारी या सर्वांनीच मनापासून भाग घेऊन स्वच्छतेचा वसा घ्यावा. स्वच्छतेसाठी श्रमदान करावे . विशेषतः प्लास्टिक मुक्त जिल्ह्यासाठी योगदान द्यावे. जिल्ह्यातील जवळपास चौदाशे ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. प्लास्टिकमुक्ती ही काळाची गरज आहे. या पंधरवड्याच्या निमित्ताने जास्तीत जास्त प्लास्टिकचे संकलन करून योग्य पद्धतीने निर्मूलन करण्याचा आणि जिल्हा प्लास्टिक मुक्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. असे सांगून त्यांनी या श्रमदानामध्ये आणि कचरामुक्ती आणि प्लास्टिक मुक्तीच्या अभियानामध्ये लोकप्रतिनिधी, सरपंच, सदस्य, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी हिरीरीने सहभाग घ्यावा. श्रमदान द्यावे आणि सातारा जिल्हा कचरामुक्त प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी आवाहन केले. गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी या श्रमदानामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.