आधी आभाळं बघायचं, वारं बघायचं मग… : अमोल कोल्हेचं राजकीय विधान

कराड | आधी आभाळं बघायचं, वारं बघायचं अन् मग नांगरायला घ्यायचं. त्यामुळे उद्याची निवडणूक लढायची की नाही ते आता कशाला सागायचं? असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी विधान केल्याने पुन्हा चर्चांना उधाण येणार आहे. गेल्या काही दिवसात अमोल कोल्हे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता पुन्हा या विधानाने राजकीय चर्चांना रंग येणार आहे.
कराड येथे शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या आयोजनाविषयी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमोल कोल्हे लोकसभा निवडणूक लढवणार का? लढवणार तर कोणत्या पक्षाकडून लढवणार? तुम्ही राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा आहेत, त्यात किती तथ्य आहे? असे प्रश्न विचारल्यावर अमोल कोल्हे हे संदिग्ध उत्तरे दिलं आहे. त्यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादीत राहणार की भाजपमध्ये जाणार? या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
सगळं राष्ट्रवादीमुळेच आहे : डाॅ. अमोल कोल्हे
मी असमाधानी असण्याचं काही कारण नाही. भाजपात जाणार असल्याच्या वावड्या उठत होत्या, की उठवल्या जात होत्या, असा प्रतिप्रश्न अमोल कोल्हेंनीच केला आहे. माझ्या सारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगा राजकारणात येतो, खासदार बनतो. मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला खासदार म्हणून निवडूण आलो, हे सगळं राष्ट्रवादीमुळे आहे.