दिल्लीत गाैरव : मलकापूर नगर परिषदेस ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’

प्रतिनिधी । विशाल वामनराव पाटील
पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुर्नवापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल राज्यातील सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस आज 4 थ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आज 4 थ्या राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय मंत्री श्री शेखावत, केंद्रीय जल शक्ती राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि विश्वेश्वर टुडू केंद्रीय सचिव पंकज कुमार व्यासपीठावर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील मलकापूर या नगर परिषदेस उत्कृष्ट नागरी स्थानिक संस्था या श्रेणीत तिसरा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष निलम येडगे आणि उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा जलनिस्सारण व आरोग्य सभापती मनोहर शिंदे यांनी स्वीकारला. मलकापूर व सुरत महानगर पालिकेसह हा पुरस्कार विभागून देण्यात आला.
मलकापूर नगर परिषदेतील 24X7 नळ पाणी पुरवठा ठरला पथदर्शी प्रकल्प
मलकापूर नगरपरिषदेने वर्ष 2009 पासून 24X7 नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली होती. सलग 15 वर्षे अखंडितपणे हि योजना सुरु आहे. यामुळे मलकापूर शहरातील नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा केला जातो. 24X7 नळ पाणी पुरवठा योजनेस वर्ष 2011 चा नॅशनल अर्बन वॉटर ॲवार्ड व पंतप्रधान पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. सदरील योजना देशभरातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरली आहे. नागरिकांना 24 तास पाणी मीटरव्दारे देण्यात येते. यामध्ये जे स्थानिक नागरीक दर महिण्याच्या 15 तारखेच्या आत पाणी पट्टी कर भरतात, त्यांना 10 टक्के सवलत दिली जात असल्याने 90 टक्के लोग पाणी पट्टी कर भरतात, अशी माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.
24X7 नळ पाणी पुरवठा योजनेसाठी कोयना नदीच्या पात्रातून जॅकवेल मधून रॉ-वॉटर घेऊन त्याच्यावर 24X7 फिल्टर प्लाटद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाने प्रक्रिया केली जाते. डी आय व एचडीपीई बंद नलिकेद्वारे एएमआर मीटरचा वापर करुन संपुर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. मलकापूर नगरपरिषद 24X7 नळ पाणी पुरवठा योजने बरोबरच मलकापूर नगरपरिषदेने सांडपाणी प्रक्रिया योजना राबविली आहे. या अंतर्गत पाण्याचा पुर्नवापर अतिशय नियोजनबद्दरित्या केला जात आहे. हे पुर्नवापर केलेले पाणी शेतीसाठी वापरण्यात येत आहे. त्यांच्या एकूण कार्याचा गौरव आज राजधानी दिल्लीत करण्यात आला.