अमृताची फळे घ्यायची असेल तर सद्भावना महत्त्वाची : डॉ. यशवंत पाटणे

मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
अमृताची फळे घ्यायची असेल तर सद्भावना महत्त्वाची ठरते. साहित्य संमेलन संस्कृतपणाचा जागर असतो. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गुंफण सदभावनेची ज्योत महाराष्ट्रात उभी करायची आहे. अशी स्पष्टोती ज्येष्ठ विचारवंत व प्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी मसूर (जि सातारा) येथे बोलताना केले. साहित्यिकांनी समाजमनात सद्भावनेचे मूल्य रुजवणे गरजेचे असून सद्भावना हाच लोकशाहीचा गाभा आहे. समाज, साहित्य आणि सद्भावना एका धाग्याने गुंफले जावेत हाच गुंफण साहित्य संमेलनाचा हेतू असल्याचे असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुंफण अकादमीच्यावतीने मसूर येथे आयोजित 18 व्या गुंफण साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष गुणवंतराव पाटील, अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, प्रसिद्ध ग्रामीण कथाकार बबन पोतदार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे, सातारच्या माजी उपनगराध्यक्षा दिपाली गोडसे उपस्थित होते.
भारताची प्रतिज्ञा पुस्तकाच्या पहिल्या पानावर दिसते, पण प्रत्यक्षात देश बांधवांमध्ये परस्पर प्रेमापेक्षा धर्मद्वेषाच्या भिंती भक्कम केल्या जात आहेत. शिक्षण, शेती, रोजगार या पोटापाण्याच्या प्रश्नांपेक्षा व्यक्तिद्वेष भडकवला जातो आहे. विस्कटलेले समाजजीवन लोकशाही मूल्यांनी सांधण्यासाठी व्यापक सद्भावनेची गरज आहे, असे विचार प्राचार्य डॉ. पाटणे यांनी यावेळी मांडले.
जगण्यासाठी भाषा आवश्यक आहे. परंतु सीमा भागातील 865 गावांना भाषेसाठी संघर्ष करावा लागत आहे. कोणतीही भाषा ही समाजभाषा असते. कारण समाजाच्या बोलीतून येणाऱ्या असंख्य शब्दातून भाषा समृद्ध होत असते. मोठमोठ्या शहरात फ्लॅट संस्कृती बंदिस्त झाल्यामुळे मुलांमधील भाषेची जाण खुंटते. त्यामुळे पालकांनी मुलांना घराबाहेर सोडले पाहिजे. त्यातून त्यांची भाषा समृद्ध होईल असे विचार संमेलनाध्यक्ष गुणवंतराव पाटील यांनी याप्रसंगी मांडले.
मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचे जतन संवर्धन व्हावे, वाचन संस्कृतीला बळ मिळावे, समाजात सद्भाव निर्माण व्हावा या उद्देशाने अकादमीच्या वतीने सातत्याने साहित्य चळवळ राबवली जात असल्याचे डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी प्रास्ताविकात सांगितले. याप्रसंगी बबन पोतदार, राजू गोडसे यांची समयोचित भाषणे झाली. दीप प्रज्वलनाने या संमेलनाचे उद्घाटन झाले. गोवा, कर्नाटक सीमा भागासह राज्यभरातून साहित्यिक उपस्थित होते. प्रारंभी मसूर प्राथमिक शाळेच्या मुलींनी ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाचे प्रसिद्ध रंगकर्मी चंद्रकांत कांबिरे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल जेधे यांनी आभार मानले.