निगडी येथे वीज वितरणचा बेजाबदारपणा : शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ

मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार अनेक वेळा वीज ग्राहकांना, शेतकऱ्यांना निदर्शनाला व अनुभवाला आला आहे. त्यात चुकीच्या वीज बिलाचा घोळ, शेतीपंपाचे वीज कनेक्शन वेळेवर न मिळणे. वितरण कंपनीच्या कार्यालयात तक्रारीसह गेल्यास न्याय न मिळणं असे अनेक अनुभवाचे किस्से वीज ग्राहकांना अनुभवास मिळाले आहेत. निगडी (ता. कराड) येथील शिवारातला अनुभव फार धक्कादायक आहे असून येथील पोल आता जमनिला ठेकायची वाट वीज वितरणचे अधिकारी पहात आहेत.
निगडी येथील शिवारात व गावात काही ठिकाणी विजेचे खांब एका बाजूस कलले आहेत. कुठलाही क्षणी जोरदार वाऱ्याच्या धक्क्याने ते कोसळू शकतात. शिवारात शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी दिवसभर वर्दळ असते. रस्त्याच्याकडेलाच खांब असल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर केव्हाही कोसळू शकतात. या खांबावरच्या विजेच्या ताराही हाताला येतील एवढ्या अंतरावर लोंबत्या स्वरूपात आहेत. हा जीवघेणा प्रकार आहे. या धोकादायक खांब व विजेच्या तारा संदर्भात वितरण कंपनीला वर्षभरात अनेकवेळा संपर्क साधला. मात्र, कंपनीने गांभीर्याने तक्रारीची दखल घेतली नाही. वीज वितरण कंपनीचा लागेना मेळ अन् शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ अशीच एकंदरीत अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या जीवाची किंमत वीज वितरण कंपनीला नाही. अशीच भावना शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.
वीज वितरणचा बेजाबदारपणा : आत्माराम घोलप
कंपनीच्या अधिकाऱ्यांविषयी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्यामध्ये उमटत आहेत. जर काही अनुचित प्रकार घडला तर जबाबदार कोणाला धरायचे असा सवाल शेतकरी विचारत आहेत. या सर्व बेजाबदारपणाला वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरावे, असे निगडीचे माजी सरपंच आत्माराम घोलप यांनी सांगितले.