‘कराडचा नवा पूल जीवघेणा’ (भाग- 3) : कंपनीवाले मस्त…लोकांचे मरण स्वस्त
कंपनीकडून मुरूम टाकून खड्डे मुजविण्याचा दिखावा

– विशाल वामनराव पाटील
कराड शहरातून व मलकापूर शहरातून जाणाऱ्या पूला संदर्भात ‘कराडचा नवा पूल जीवघेणा’ अशी मालिका लागताच, आता संबंधित डीपी जैन कंपनीकडून रस्त्यावर खड्डे मुजवण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, पावसाळा सुरू असताना केवळ मुरूम टाकल्याने पुन्हा रस्ते खचणार आहेत. त्यामुळे केवळ दिखावा दाखवण्यासाठी काम सुरू असल्याचे नागरिकांच्यातून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे कराडकरांसह पश्चिम महाराष्ट्रातील या रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या लोकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे दिसत आहे. अशी परिस्थिती असताना स्थानिक प्रशासन, समाजिक संघटना आणि कार्यकर्ते बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. त्यामुळे एकंदरीत कंपनीवाले मस्त अन् लोकांचे मरण स्वत असे काही चित्र पहायला मिळत आहे.
मुख्य अदानी कंपनी तर सब ठेकेदार असलेली डीपी जैन कंपनीला कोट्यावधीचे टेंडर मिळालेले आहे. यामध्ये वाहन चालक तसेच लोकांची काळजी घेणे कंपनीचे काम आहे. यासाठी पूल सुरू होण्याअगोदर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी किती काळजी हे सांगितले होते. परंतु आता अधिकारी नागरिकांच्या जीवाची परवा करण्याऐवजी खेळ करत आहेत. या पुलाच्या कामाच्या दरम्यान कोल्हापूर नाका ते पाचवड फाटा या ठिकाणी सर्व्हिस रोड ठिकठिकाणी खचला आहे. या रस्त्याचं काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच करणे गरजेचे असताना, त्याकडे कंपनीने दुर्लक्ष केल्याचं दिसून आले आहे. आता जोरदार पावसाळा सुरू असताना केवळ लोकांना आम्ही काहीतरी काम करतोय, हे दाखविण्यासाठी मुरूम टाकत आहेत.
गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी याच मार्गावर एका ठिकाणी ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार ठार झाला, तेव्हा खरेतर रस्त्यावरती मुरमाचे ढीग आणून ते मनमानी पद्धतीने ठेकेदार कंपनीने रचलेले होते. तेव्हा आता या दुचाकी चालकाच्या मृत्यूप्रकरणी ट्रक चालकावरती गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, बेजबाबदारपणे रस्त्यावरती मुरूम ठेवणाऱ्या कंपनी वरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. तेव्हा ठेकेदार कंपनीने अनेक ठिकाणी बेजबाबदारपणे काम केलेले असून त्याकडे पोलिस, महसूल, बांधकाम प्रशासन असेल किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटना व त्याचे कार्यकर्ते दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्यामुळेच कंपनीचे अधिकारी मस्त आणि लोकांचा जीव स्वस्त अशी परिस्थिती या पुलाच्या कामाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. तेव्हा आता तरी सामाजिक कार्यकर्ते, संघटना तसेच प्रशासन दखल घेणार की बघ्याची भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.
मंगळवारी मनसे रास्तारोको करणार : दादासो शिंगण
पूलाच्या कामा संदर्भात मी तीन निवेदनं दिली आहे. आज रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम चुकीच्या पध्दतीने सुरू आहे. नदीला पूर आलेला असताना, नदीवरील पुलाचे काम सुरू आहे. कंपनीकडून लवकरात लवकर काम उरकरण्याच्या नादात काही ठिकाणी बेजाबदारपणा दिसत आहे. तेव्हा प्रशासकीय यंत्रणेने व कंपनीने लवकरात लवकर आमच्या निवेदनाला उत्तर द्यावे, अन्यथा मंगळवारी मनसेकडून कोल्हापूर नाका येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे मनसेचे तालुकाध्यक्ष दादासो शिंगण यांनी सांगितले.