दरड कोसळणे, भूस्खलनाची संभाव्य लक्षणे जाणून घ्या : जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनाला सूचना

सातारा | जिल्ह्यात गेल्या सात ते आठ दिवसांपासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे दरडी कोसळणे, भूस्खलन यांचा धोका वाढलेला आहे. अशा स्थितीत प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी संभाव्य धोक्यांचा इशारा देणारी लक्षणे लक्षात घेऊन तात्काळ लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. लोकांचे जीव वाचविणे या गोष्टीला प्राधान्य देऊन त्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व उपाययोजना त्वरित कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व भूस्खलन आणि पुनर्वसन बाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दूरदृष्टी प्रणाली द्वारे बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
दरड कोसळण्यापूर्वी, भूस्खलनापूर्वी संभाव्य धोक्याची खालील लक्षणे दिसताच नागरिकांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
या बैठकीसाठी जीआयसीचे तज्ज्ञ हेमंत कुलकर्णी यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. यांनी संभाव्य भूस्खलनापूर्वी, दरड कोसळण्यापूर्वी दिसणाऱ्या लक्षणांची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, कोयना खोऱ्यातील भूस्खलन प्रवण भागाचा विशेष अभ्यास करून यादी तयार करण्यात येत आहे . आठ ते दहा दिवस सरासरी 100 मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस या खोऱ्यात सुरू असल्याने पुढच्या 36 ते 72 तासात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. भूस्खलनाचा धोका संभावन्यापूर्वी पुढील लक्षणे आढळून येतात . यामध्ये दोन- तीन तासापेक्षा जास्त विहिरी ओसंडून वाहणे, नवीन झरे फुटणे, अस्तित्वात असणाऱ्या झऱ्यांचा विसर्ग वाढणे, त्यांच्या पाण्याच्या तापमानात काही अंशी वाढ होणे, बोरवेल, हातपंप या मधून आपोआप पाणी वाहणे, मानवी वस्ती असणाऱ्या घरांच्या खालूनही पाणी वर येणे, दगडाखालील जमिनीला भेगा पडणे, याबरोबरच पाळीव कुत्री, गोठ्यातील जनावरे यांनाही काही काळ आधी धोका कळतो त्यामुळे त्यांचे निरीक्षण करावे. अशी सर्व लक्षणे विशेषत्वाने जाणवतात याकडे बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. नागरिकांचे स्थलांतर करताना 350 मीटर च्या बाहेर स्थलांतर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.