आ. बाळासाहेब पाटील आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश : अखेर 22 ऑगस्टला पाणी येणार

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
पाणी आमच्या हक्काचं. नाही कोणाच्या बापाचं…. शेतकरी एकजुटीचा विजय असो…. अशा निनादात कराड उत्तरच्या मसूर विभागातल्या 19 गावांच्या शेतकऱ्यांनी हणबरवाडी – शहापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळण्यासाठी मसूरला चौकात केलेला रस्ता रोको अखेर 22 ऑगस्टला पाणी सोडण्याच्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला. पंढरपूर, कराड, उंब्रज, कोरेगाव मार्गावर जाणारी वाहतूक चौकात चारही बाजूला ठप्प झाली होती. माजी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
आमदार पाटील व जलसंपदा अधिकारी यांच्यात पाणी सोडण्यासंदर्भात धुमसचक्री उडाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. पाणी सोडण्यासंदर्भात अधिकारी ठाम आश्वासन देत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी चौकात रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आमदार श्री. पाटील यांच्यासह मानसिंगराव जगदाळे, अजितराव पाटील- चिखलीकर, प्रशांत यादव, संगीता साळुंखे, तानाजी साळुंखे, लहुराज जाधव, माणिकराव पाटील, डॉ. विजय साळुंखे, लालासाहेब पाटील व भागातल्या 19 गावांच्या शेतकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी हक्काच्या पाण्यासाठी चौकात ठाण मांडले.
चर्चेनुसार अधिकारी पाणी सोडण्यासंदर्भात निर्णय देत नव्हते. निर्णयाशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा ठाम निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. त्यानंतर थेट पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी संपर्क साधला. मंत्री देसाई व आमदार पाटील यांच्यात चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया मंत्री देसाई यांच्या कानावर घातल्या. त्यानंतर त्यांनी 22 ऑगस्टला पाणी सोडण्यासंदर्भात ठाम आश्वासन आमदार पाटील यांना दिले. आश्वासनानंतर पाऊण तास चाललेला रस्ता रोको मागे घेण्यात आला. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता घनवट, उपविभागीय अभियंता घोलप, उपअभियंता उदय नांगरे आंदोलन स्थळी दाखल होते. रमेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले हणबरवाडी- शहापूर योजनेचे हक्काचं पाणी शिल्लक असताना न मिळाल्याने आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला. योजनेच्या पाण्यासाठी पाठपुरावा केला. डिसेंबरला पाण्याची चाचणी घेण्यात आली. विभागातील 2600 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. 22 ऑगस्टला पाणी सोडणार या पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला आहे. पाणी सोडले नाही तर 23 ऑगस्टला उग्र आंदोलन करण्यात येईल.