पाणी टंचाई भागात बंधाऱ्यांची दुरुस्ती, विहिरीचे खोलीकरणाची कामे तात्काळ करा : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड । सद्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून कराड तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील ज्या गावांमध्ये पाणी टंचाई आहे अशा गावांचा आढावा आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शासकीय विश्रामगृह येथे घेतला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, तालुका गटविकास अधिकारी मीना साळुंखे, नायब तहसीलदार बी. के राठोड, पी डब्लू डी, एम जी पी आदी विभागांचे अधिकारी आदींच्यासह मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, शंकरराव खबाले, मंगल गलांडे, पंचायत समिती माजी उपसभापती रमेश देशमुख, राजेंद्र चव्हाण आदीच्या सह संबंधित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड तालुक्यातील टंचाई सदृश गावांचा गावनिहाय आढावा घेतला. त्या गावातील सद्याच्या समस्या जाणून घेतल्या तसेच उपस्थित असणाऱ्या त्या- त्या गावातील ग्रामपंचायत सदस्यांच्या समस्या जाणून घेत त्याप्रमाणे सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. कराड तालुक्यात वानरवाडी, बामणवाडी, येवती, भुरभुशी, पवारवाडी-नांदगाव, भरेवाडी, ओङोशी, मस्करवाडी- उंब्रज, घोलपवाडी, गोसावीवाडी, गायकवाडवाडी, नाणेगाव, कोरीवले, वडगाव-उंब्रज, गोडवाडी, अंधारवाडी आदी गावामध्ये सद्या टँकरने पाणीपुरवठा सुरु असून यामधील वानरवाडी, बामणवाडी, येवती, भुरभुशी, पवारवाडी- नांदगाव, भरेवाडी,या गावांना मलकापूर नगरपरिषदेतून टँकर ने पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच ज्या गावांना टँकरची आवश्यकता आहे अशा गावांना तात्काळ टँकर पाठविले जावेत अशा सूचना आ. चव्हाण यांनी दिल्या.
मान्सून लांबणीवर गेल्यामुळे पाणी टंचाई परिस्थिती अधिक भीषण होऊ नये यासाठी हि टंचाई बैठक महत्वाची मानली जात आहे. या आढावा मिटिंग मधून ज्या गावांना अजूनही पाणी टँकरने सुरु नाही. तिथे टँकर देण्याच्या सूचना दिल्या. गेल्या तसेच संबंधित गावातील बंधाऱ्यांची दुरुस्ती, विहिरीचे खोलीकरण अशी कामे तात्काळ केली जावी, अशा सूचना यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच याबाबतचा अहवाल देखील सादर करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.