सातारा जिल्हा विधानसभेला 100 टक्के स्ट्राईक रेट देणार :- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
कराड येथे सातारा जिल्हा भाजपचे अधिवेशन

कराड :- सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत झाले आहे. येथील लोकसभेची जागाही आपण जिंकली असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप- महायुती सातारा जिल्हात 100 टक्के स्ट्राईक रेट देणार असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले तसेच महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकतीने कामाला लागा. नरेटीव निर्माण करण्याचे विरोधकांचे षडयंत्र तोडून काढा असे आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.
कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सातारा जिल्हा भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे अधिवेशन आज रविवारी संपन्न झाले. या अधिवेशनास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी आमदार जयकुमार गोरे, भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, डॉ.अतुलबाबा भोसले, विक्रम पावसकर, मनोजदादा घोरपडे, डॉ. दिलीप येळगावकर, आनंदराव पाटील, मकरंद देशपांडे,चित्रलेखा माने कदम, किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ, भरत पाटील, सुरेश खाडे, विक्रमबाबा पाटणकर, प्रियाताई शिंदे, सुरभीताई भोसले, संतोष कणसे, महेशबाबा जाधव, सागर शिवदास, शंकर शेजवळ, सुनील शिंदे, चिन्मय कुलकर्णी, अनुप शहा, विठ्ठल बलसेठवार, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. मुरलीधर मोहोळ म्हणाले, देशात मोदी सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर निधी टाकण्यात आला असून मोदी सरकारने राज्याची अनेक चांगली कामे हाती घेतली आहेत. तसेच राज्यातील सरकारनेही जनहितार्थ योजना राबवल्या आहेत. लाडकी बहीण योजना, मुलींना उच्च शिक्षण घेण्याची मोफत सुविधा, एसटीची सवलत यासारख्या अनेक योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. मात्र हिंदुत्वाचा विषय घेऊन हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे खोटे नरेटीव पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत ते हाणून पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. नरेटीव होऊनच द्यायचा नाही, तो तोडला पाहिजे असे आवाहन त्यांनी अधिवेशनात केले. लोकसभेला साताऱ्याची जागा आपण जिंकली तसेच काम येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीत करून राज्यातील एकेक जागा निवडून आणण्यासाठी प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे.
महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात आपली ताकद आहे. महायुती आपल्याला जो उमेदवार देईल तो आपण निवडून आणावा.देशात पन्नास टक्के लोक हे सहकाराने जोडले गेले आहेत. राज्यातील साखर कारखान्यांना जिवंत ठरवण्यासाठी सात हजार कोटी रुपये दिले असून 15 हजार कोटींचा टॅक्स माफी केल्याचे मंत्री मोहोळ यांनी सांगितले. कार्यकर्ता ही आपल्या संघटनेची ताकद आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्हा शंभर टक्के स्ट्राईक रेट देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, तळागाळातील कार्यकर्तानी माझा पक्ष म्हणून काम केले त्यामुळे सातारा जिल्हा भाजपचा बालेकिल्ला झाला. राज्य्याच्या व सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून येणारी विधानसभा निवडणुक ताकदीने लढवून पुन्हा महायुतीच्या नेत्यांचे हात बळकट करुया.
सातारा जिल्हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा बालेकिल्ला :- धैर्यशील कदम
भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले, भारतीय जनता पार्टी ही सातारा जिल्ह्यात ताकतीने उतरली आहे. हा राष्ट्रवादीचा, शरद पवारांचा बालेकिल्ला म्हटले जात होते, मात्र तसे अजिबात नाही. आठही विधानसभा मतदारसंघ फक्त देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहेत. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व जनतेने जिल्ह्याची मान ताठ ठेवण्याचे काम केले. विधानसभा निवडणुकीत जिल्हाला संधी दिली तर कमळ चिन्हावर आठवी मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील बहुसंख्येने आमदार निवडून येतील असा विश्वास धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला. पक्ष संघटनेने जिल्ह्याचे राजकीय पालकत्व घ्यावे. आगामी विधानसभेत दोन-तीन महिने सर्वांनी ताकतीने काम करू देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागावे. यावेळी डॉक्टर अतुल भोसले, रामकृष्ण वेताळ यांनी मनोगत व्यक्त केले. अधिवेशनात जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आले.