सत्ताधाऱ्यांनी बाजार समितीला राजकारणाचा अड्डा बनविला : डॉ. अतुल भोसले

कराड | गेल्या 5 वर्षांत सत्ताधाऱ्यांना कराड शेती उत्पन्न बाजार समितीचा ना नफा वाढविता आला; ना शेतकऱ्यांचे भले करता आले. सत्ताधाऱ्यांनी केवळ बाजार समितीला राजकारणाचा अड्डा बनविला, अशी प्रखर टीका कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी केली. शेतकरी विकास पॅनेलच्यावतीने नांदगाव (ता. कराड) येथील श्रीराज मंगल कार्यालयात आयोजित कराड दक्षिणमधील मतदार व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
अभूतपूर्व गर्दीत पार पडलेल्या या मेळाव्याच्या व्यासपीठावर माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, ॲड. राजाभाऊ उंडाळकर, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवित आहोत. ज्या काळात आमच्याकडे बाजार समिती होती, त्या 5 वर्षांच्या काळात आम्ही समितीचे उत्पन्न वाढविले. आपल्या येथे गूळ, हळद मोठ्या प्रमाणावर असताना इथल्या शेतकऱ्याला बाहेरच्या बाजारपेठेत का जावे लागते? उंब्रज, मसूर येथील उपबाजारांचा विकास करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी काय केले? याचे त्यांनी उत्तर द्यावे. सत्ताधाऱ्यांकडे बोलण्यासाठी मुद्दे नसल्याने ते वैयक्तिक टीका करु लागले आहेत.
‘त्यांनी’ एखादी पानपट्टी तरी काढली का?
उमेदवार पैलवान आनंदराव मोहिते म्हणाले, की बाजार समितीची सत्ता इतकी वर्षे ताब्यात असतानाही सत्ताधारी मंडळी त्यांच्या कारभाराबाबत बोलण्यापेक्षा भोसले व पाटील कुटुंबावर नाहक टीका करत आहेत. खरंतर सहकारात उत्तुंग काम केलेल्या या कुटुंबांवर बोलण्याचा कोणताही नैतिक हक्क मंडळींना नाही. कारण ज्यांनी आमदारकी, खासदारकी आणि मुख्यमंत्रीपद भोगले अशांनी सहकारात एखादी संस्था काढायचे राहू दे, निदान एखादी पानपट्टी तरी काढली का? याचे उत्तर द्यावे, अशी टीका त्यांनी केली.