वारीला निघालेल्या दिंड्याच्या टोलवरून टोलनाक्यावर गोंधळ उडाला

सातारा | आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून आळंदीच्या दिशेने लाखो भाविक प्रस्थान करत असतात. अनेक ठिकाणांहून पायी दिंडी निघतात. यावेळी दिंडीतील वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी दिली जाते. परंतु साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावरील टोल प्रशासनाचा मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आला. वारकऱ्यांच्या दिंडीतील निघालेल्या गाड्यांना आनेवाडी टोल नाक्यावरील रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाचे आदेश डावलून टोलमाफी नाकारल्याने टोलनाक्यावर काहीकाळ गोंधळाचे वातावरण झाले होते.
रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी नाकारताच वारकरी आक्रमक झाले. यावेळी वारकरी आणि रिलायन्सच्या अधिकाऱ्यांमध्ये काहीवेळ तणातणी झाल्याने टोलनाक्यावरील वातावरण तणावपूर्ण झाले होते. यावेळी भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी धाव घेत मध्यस्थी करून वाहतूक सुरळीत केली. मात्र, आनेवाडी टोल नाक्यावरील प्रशासन आणि रिलायन्सचे सोकावलेले अधिकारी कधी सुधारणार? असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.
आनेवाडी टोलनाक्यावर जवळपास दहा वाहने उभी होती. एक तास हा गोंधळ सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलवरून मोफत सोडण्याचे आदेश दिले, तरीदेखील मुजोर अधिकारी अशा आदेशाकडे दुर्लक्ष करत आहेत. या वेळी तात्यासाहेब वासकर कोल्हापूर फड, अप्पासाहेब वासकर, आजरेकर, देहूकर, हभप तुकाराम मांडवकर कोल्हापूर, विठ्ठल पाटील, अप्पासाहेब वासकर फड, निवृत्ती महाराज ही प्रमुख मंडळी यावेळी वारकऱ्यांसोबत होती. त्यांनाही या अधिकाऱ्यांनी अरेरावी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.