पाणी टंचाई : सातारा जिल्ह्यातील ‘या’ शहरात एक दिवसाआड पाणी मिळणार

सातारा | कृष्णा व वसना नदीची पाणी पातळी खालवल्याने नैसर्गिक पाणी टंचाई जाणवू लागली आहे. तेव्हा आता कोरेगाव शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती कोरेगाव नगरपंचायत नगराध्यक्षा दिपाली बर्गे यांनी दिली.
कोरेगाव नगरपंचायत येथे माध्यमांना पाणी टंचाई बाबत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी माहिती दिली. यावेळी नगराध्यक्षा साै. बर्गे म्हणाल्या, शहराला पाणी टंचाई जाणवत असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे. पाणीसाठी दोन दिवसाचा करून ठेवावा, तसेच पाणी जपून वापरावे. वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर करू नये. पाणी वाया जावू नये यासाठी नळांचे लिकेज काढून घ्यावेत. पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी टंचाई जाणवणार आहे. तेव्हा नागरिकांनी नगरपंचायतीला सहकार्य करावे. शहरात रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाईप फुटल्याने गढूळ पाणी येत आहे.
उपनगराध्यक्ष सुनिल बर्गे म्हणाले, कोरेगाव शहरात होणाऱ्या पाणी टंचाईबाबत मिटींग झाली. त्यामध्ये दररोज पाणी पुरवठा होवू शकत नाही, त्यामुळे एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येईल. सन 1996 साली कोरेगाव शहराची पाणीपुरवठा योजना झाली होती. त्यामुळे आ. महेश शिंदे यांनी 68 कोटी रूपयांची 24 बाय 7 योजना शहरासाठी मंजुरीचे काम केले आहे.