
कराड ः- घारेवाडी (ता. कराड) येथील शिवम्ं प्रतिष्ठानच्यावतीने घारेवाडीतील धुळोबा डोंगर परिसरात आयोजीत बलशाली युवा हदय संमेलनचा दिपप्रज्वलनाने गुजरातच्या समाजसेविका मित्तल पटेल यांच्या हस्ते प्रारंभ झाला. प्रतिष्ठानचे प्रमुख माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, जयवंत चव्हाण, अशुतोष गोडबोले, आरटीओ चैतन्य कणसे यांच्यासह शिवमचे संचालक, विभाग प्रमुख, समिती सदस्यांसह राज्यातुन आलेले युवक-युवती उपस्थित होत्या.
श्रीमती मित्तल म्हणाल्या, माझ्या घरची परिस्थीची चांगली नसल्याने आई-वडील अशिक्षित होते. त्यांची मी शिकली पाहिजे अशी इच्छा होती.मलाही लाल दिव्याच्या गाडीचे मोठे आकर्षण होते. त्यामुळे मी यूपीएससीची परीक्षा देण्याचे ठरवले होते. त्यादरम्यान मी पहिल्या टप्यात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला प्रारंभ केला. त्यावेळी मी ऊसतोड मजुरांवर अभ्यास सुरु केला. त्यावेळी त्यांना साधा मतदानाची अधिकार नाही हे पाहुन मला खुप वाईट वाटले. त्या समाजातील लोकांची आम्हाला फोटोचे कार्ड म्हणजेच मतदान ओळखपत्र मिळावे एवढीच माफक अपेक्षा होती. मात्र स्वातंत्र्यानंतरही त्यांना ते मिळालेले नव्हते. त्यांच्या पाणी, आरोग्य, पगार यासह अन्य प्रश्न हाती घेवुन लढा सुरु केला. त्यासाठी मी सरकारी यंत्रणेकडे गेल्यावर त्यांनी ती सिस्टीमच नसल्याचे सांगीतले. त्यासाठी स्वतःला धीट करुन त्यांच्यासाठी लढायचे ठरवले.
छत्रपती शाहू महाराजांची प्रेरणा
छत्रपती शाहू महाराजांची प्रेरणा घेवुन गुजरात राज्यातील ४० दुर्लक्षीत जातीपर्यंत मी पोहचले. लाखो लोकांना शोधुन काढुन त्यांना मतदान ओळखपत्र, आधार कार्ड देण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातुन माणसाला माणूस बनवण्याचे काम शिवम च्या माध्यमातून होत आहे, ही देशासाठी खूप मोठी गोष्ट आहे. छत्रपती शाहू महाराजांनी सर्वांना समान न्याय देण्याची व्यवस्था आणली. त्यांचीच प्रेरणा घेवुन मी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनाही पत्र लिहीताना त्यांचे नाव आजही लिहते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी प्रास्तविक केले. विठ्ठल मोहित, युवराज पाटील यांनी सुत्रसंचालन केले.



