मसूरला घरे आणि दुकानांवर बांधकाम खात्याचा हातोडा पडणार नाही : धैर्यशील कदम

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
मसूरला रस्ता रुंदीकरण संदर्भात पोलीस स्टेशन ते कोरेगाव फाट्यापर्यंत नाल्याच्या आत पाडापाडी नाही. कराडला गुरुवारी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी समन्वयाद्वारे चर्चा करणार आहे.लोकवस्तीतील घरे व दुकाने उध्वस्त होणार नाहीत, अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दीक्षित, ग्रामपंचायत सदस्य संजय शिरतोडे, माजी उपसरपंच सावळाराम कांबळे, भाजपच्या महिला आघाडीच्या महिला संघटक दिपाली खोत, शिवसेना ठाकरे गटाचे कराड तालुका अध्यक्ष सतीश पाटील, भाजपचे जयवंत जगदाळे, बाजीराव वायदंडे, श्रीकांत जिरंगे, यांच्यासह व्यवसायिक, उद्योजक, ग्रामस्थ उपस्थित होते.
मसूर – कराड रस्त्याचे चौपदरीकरण व उंब्रज मसूर रस्त्याचे लांबीचे सुधारित करून व बंदिस्त गटर या रस्ता विकासकामी मसूरचा चेहरा मोहरा उध्वस्त होणार नाही, यासाठी प्रयत्न करणार आहे. लोकवस्तीमध्ये बांधकाम खात्याच्या मूळच्या गटारची हद्द कायम करून पोलीस स्टेशन ते काबीरवाडी -कोरेगाव फाट्यापर्यंत जनसामान्यांची घरे, व्यवसाया बाबत नुकसान होणार नाही, अशी ठाम ग्वाही देत धैर्यशील कदम यांनी मसूरकरांना बांधकाम खात्याच्या हातोड्याबाबत दिलासा दिला. मसूरच्या विस्तारीकरणांत अगोदरच बाजारपेठेचे वैभव नामशेष झाले आहे. त्यातच आता रस्ता रुंदीकरणाच्या कामात बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली मापे हद्द पाहता मसूरच्या व्यवसायाचे विद्रूपीकरण होणार असल्याच्या भीतीने धाबे दणाणले आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.
बांधकाम खात्याने इतर ठिकाणी दाखवलेली लोकवस्तीतील शिथिलता मसूरमध्येही दाखवून 80 फुटाचा रस्ता मसूरकरांच्यावर न लादता बांधकाम खात्याच्या मूळच्या हद्दीतील नाल्याची हद्द कायम केल्यास त्यास मसूरकरांचा विरोध राहणार नाही. पश्चिम भागात मागासवर्गीयांची घरे जाऊन ती बेघर होणार आहेत. बांधकाम खात्याच्या हातोड्यामध्ये अनेकांची घरे व्यवसाय नामशेष होऊन ते रस्त्यावर येणार असल्याची कैफियत ग्रामस्थांनी मांडल्यानंतर धैर्यशील कदम म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या दोन्ही रस्त्यासाठी निधी दिला आहे. यामध्ये कुणाची दुकाने, घरे पाडून रस्ता होणार नाही याची दक्षता घेऊ. मसूरच्या जनतेने अतिक्रमणाबाबत यापूर्वीही सहकार्य केले आहे. बांधकाम खात्याचे मूळ नाल्यावरील हद्द कायम करून त्यावरील अतिक्रमणे संबंधितांनी काढून घ्यावीत. विशेषतः नाल्याच्या आतच रस्ता होईल. गटारच्या आत कुठेही पाडा पाडी होणार नाही. मसूरच्या पोलीस स्टेशन ते कोरेगाव काम्बीरवाडी फाट्यापर्यंत कोणाचेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही धैर्यशील कदम यांनी दिली.
गेली आठवडाभर प्रसार माध्यमातून रस्ता रुंदीकरणा बाबतच्या व्यथा ऐकतो आहोत. लोक वस्तीतील घरे व्यवसायांचे नुकसान होणार आहे. याप्रकरणी अनेकांनी दूरध्वनी करून आपणाकडे व्यथा मांडल्या. त्यानुसार त्याची तातडीने दखल घेत दिलेला शब्द पाळणार आहे, असा दिलासा धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला…!