वहागावला मटणाच्या जेवणातून 23 जणांना विषबाधा : एकाचा मृत्यू

कराड | वहागाव (ता. कराड) येथे मांसाहारी जेवणातून 23 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली असुन त्यातील एक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, तुकाराम विठ्ठल राऊत (रा. वहागाव, ता. कराड) यांच्यावर उपचार चालू असतानाच रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला आहे. पत्नी सुनंदा तुकाराम राऊत व सचिन वसंत सोनुलकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण व कराड गटविकास अधिकारी मिनाताई साळुंखे यांनी वहागाव येथे धाव घेत तेथील जेवणाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वहागाव येथील तुकाराम विठ्ठल राऊत यांच्या नातेवाईकाची शुक्रवारी दि. 2 जूनला मांसाहारी जेवणाची देवाची यात्रा होती. त्यानिमित्त त्यांनी येतगाव (ता. कडेगाव), गोळेश्वर, अभयनगर, विंग तसेच स्थानिक वहागाव मधील 35 पैपाहुणे व नातेवाईकनां जेवण्यासाठी निमंत्रित केले होते. शुक्रवारी मांसाहारी जेवण झाल्यानंतर शनिवारपासून 35 जणांपैकी तुकाराम विठ्ठल राऊत यांच्या कुटुंबीयांसह 23 जणांना उलट्या व जुलाब होऊ लागले. विषबाधा झालेल्या 23 जणांमध्ये वहागावमधील 11, येतगाव 4, गोळेश्वर 2, अभयनगर 3, व विंग येथील 3 जणांचा समावेश आहे.
उलट्या व जुलाबाचे प्रमाण वाढल्यामुळे तुकाराम विठ्ठल राऊत, पत्नी सुनंदा तुकाराम राऊत आणि सचिन वसंत सोनुलकर यांना कराड येथे खाजगी रुग्णालयात उपचार करता दाखल केले. तसेच वहागाव येथील वसंत अण्णा सोनुलकर, गणेश बाळासो पवार, मनोहर जयवंत पवार, भामा वसंत सोनवलकर, लक्ष्मण ज्ञानदेव राऊत ,अनिकेत लक्ष्मण राऊत, अण्णा लक्ष्मण सरगर ,लक्ष्मण विष्णू सरगर, आणि जयेश सदाशिव पवार यांना वहागाव आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात उपचार करता दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.