माण- खटाव तालुक्यात नारळ फोडण्याचा धंदा : रणजितसिंह देशमुख यांची आ. गोरेंवर टीका
माण- खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काॅंग्रेसचा रास्तारोको

दहिवडी | काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना माण- खटाव तालुक्यात श्वासवत पाणी आलं. त्यानंतर केवळ नारळ फोडण्याचा धंदा केलेला आहे. आजअखेर कुठलंही पाणी आलं नाही. त्यामुळे आमच्यावर आंदोलनाची वेळ आली आहे, अशी टीका भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर काॅंग्रेसचे प्रदेश सदस्य रणजितसिंह देशमुख यांनी केली. जवळपास 2 तासांहून अधिक काळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले, यावेळी पोलिसांची आंदोलकांशी झटापट झाली. आंदोलकांना पोलिसांनी गाडीत बसवून दहिवडी पोलिस ठाण्यात काही काळ थांबविले.
दहिवडी (ता. माण) येथे माण- खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणि चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने कराड – बारामती आणि सातारा- पंढरपूर रस्त्यावरील रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी काँग्रेस प्रदेश सदस्य रणजितसिंह देशमुख, युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत, प्रभारी महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेस उदय भानू चिंब, सहप्रभारी एहसास खान, जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे, युवक काॅंग्रेस खटाव तालुकाध्यक्ष आण्णासाहेब काकडे, झाकीर पठाण, संजय साळुंखे, राजूभाई मुलाणी, संतोष गोडसे, एम. के. भोसले, विश्वभंर बाबर, सुर्यभान जाधव, डाॅ. महेश गुरव, संदीप सजगने, बाबासाहेब माने, विजयराव शिंदे, सत्यमान कमाने, सत्यवान कांबळे, अभयकुमार देशमुख, योगेश भोसले, नकुसाताई जाधव, शारदाताई भस्मे, वैशाली चव्हाण यांच्यासह शेकडो माण- खटाव तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरली होती.
रणजिंतसिंह देशमुख म्हणाले, माण तालुक्यात 70 ते 80 गावात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शेतकऱ्यांकडून उरमोडी व तारळीची पाणीपट्टी वसूल केली जात आहे. अनेक ठिकाणी जनावरांना आज चारा मिळत नाही, अशा परिस्थितीत चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जनतेकडून होत आहे. तरीही याकडे सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे माण- खटाव तालुक्यातील जनतेची मागणी विचारात घेवून दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल.