रामनवमीच्या काळातील दंगली पूर्वनियोजित होत्या : आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपावर गंभीर आरोप

सातारा । निवडणुका जिंकण्याकरता देशात धार्मिक ध्रुवीकरण, द्वेषाचे वातावरण निर्माण केल्याशिवाय भाजपाला यश मिळत नाही. रामनवमीच्या काळात झालेल्या दंगली ह्या पूर्वनियोजित होत्या. आताही कुरापत काढून द्वेष पसरावयाचा, दंगली घडवून आणायच्या, मोर्चे काढायचे. अल्पसंख्यांक समाजाला भयभीत करण्याच्या प्रयत्न केला जात आहे. सरकारच्या गृहमंत्रालयाला कायदा- सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले असून त्यांना कायदा- सुव्यवस्था ठेवायची नाही. कोल्हापूर मध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला, पण त्यावर नियंत्रण आणण्यात यश आले आहे. मात्र, आम्हाला भीती आहे. राज्यभर- देशभर अशा दंगली घडविण्याचे प्रयत्न होतील असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भाजपावर केला आहे.
सातारा येथे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे काॅंग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर येथे झालेल्या राड्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. देशात सध्या भारतीय जनता पक्षाकडून धार्मिक, जातीय तेढ निर्माण केला जात असल्याचा गंभीर आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, इतिहास बदलण्याचे सध्या काम चालू आहे. इतिहास तज्ञांना न विचारता धडेच्या धडे बदलले जावू लागले आहेत. देशात जे काही घडले असेल तो खरा इतिहास लोकांच्यापुढे मांडला पाहिजे. लोक ठरवतील काय करायचे, तुम्ही केवळ माहिती देण्याचं काम करा. परंतु आता तुम्हाला फक्त ध्रुवीकरण करायचे आहे.