यावर्षीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार डॉ. भरत वतवाणी यांना जाहीर
उंडाळे येथे मंगळवारी माजी सैनिक मेळावा

कराड : – उंडाळे येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 51 व्या स्मृतीदिनानिमित्त 42 वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा मंगळवार दि. 18 फेब्रुवारी रोजी होत आहे. अधिवेशनात यावर्षीचा मानाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त मानसोपचार तज्ञ डॉ. भरत वतवाणी यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. 51 हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाळ, श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरूप आहे.
दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त व रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील व व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा.गणपतराव कणसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रा. धनाजीराव काटकर यांची उपस्थिती होती. मंगळवार दि. 18 रोजी दुपारी दोन वाजता स्वा. दादा उंडाळकर स्मारक मंदीर उंडाळे येथे अधिवेशनात पुरस्काराचे वितरण होणार आहे.
डॉ. भरत वतवाणी यांचे कार्य :- डॉ. भरत वतवाणी यांचे रस्त्याने फिरणारे मनोरुग्ण यांच्या बाबतीत मोठे कार्य असून त्यांनी आजपर्यंत तब्बल 7000 रुग्णांवर उपचार करून त्यांना त्याच्या घरी पाठवले आहे. वतवाणी यांचा जन्म कलकत्ता येथील तर त्याचे शिक्षण मुंबई येथे झाले.1988 पासून त्यांनी मनोरुग्णासाठी श्रद्धा पुनवर्सन केंद्र स्थापन केले.आज कर्जत येथे ही केंद्र सुरू असून 120 मनोरुग्ण उपचार घेत आहेत.या कार्याची दखल घेऊन सन 2018 मध्ये फिलीफाईन सरकारने त्यांचा रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरव केला आहे.
स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराने आत्तापर्यंत सन्मानित मान्यवर :- स्वातंत्र सेनानी माजी राजदूत एन. जी. गोरे, सुप्रसिध्द कवी ना.धो. महानोर, स्वातंत्र्य सेनानी श्रीमती उषा मेहता, स्वा. से. गोविंदभाई श्रॉफ, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती निलमताई देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारीया, स्वा. से. व साहित्यिक जी. पी. प्रधान, प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम गरूड, शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य पी. बी. पाटील, स्वा. सै. प्रभाकररावजी कुंटे, न्यायमूर्ती पी.बी. सावंत, कृषीतज्ज्ञ डॉ. जयंत पाटील, पत्रकार पी. साईनाथ, प्रसिध्द वकील अॅड. उज्ज्वल निकम, डॉ. अभय बंग, जे.जे. रूग्णालयाचे नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, अर्थशास्त्रज्ञ निळकंठ रथ, लेखक व विचारवंत डॉ. सदानंद मोरे, डॉ. प्रकाश आमटे, स्वातंत्र्य सेनानी भाई वैद्य, लेखक सुरेश व्दादशीवार, डॉ. विवेक सावंत, पद्मश्री डॉ. गणेश देवी, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, अभिनेते मकरंद अनासपुरे, अशोक जैन यांचा समावेश आहे.