ठाकरे गटाचा रास्तारोको : आनेवाडी, तासवडे टोलनाका ‘फ्री’ करा

वैभव बोडके | सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात असणाऱ्या आनेवाडी व तासवडे टोल नाक्यांवर सातारा जिल्ह्यातील नागरिकांना टोल फ्री करावा. यासाठी आज सातारा शहराजवळ असणाऱ्या आनेवाडी टोलनाक्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या रस्ता रोकोमुळे पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, समन्वयक रामदास कांबळे, सुधीर राऊत, विश्वनाथ धनावडे, अजित यादव, माऊली पिसाळ यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सचिन मोहिते म्हणाले, गेल्यास दहा वर्षाचा उद्रेक आहे. आमच्याकडून अन्यायकारक पद्धतीने टोल वसुली सुरू आहे. या अन्यायकारक टोल वसुलीमुळे कोट्यावधींची टोल वसुली झाली आहे. अशाच पद्धतीने 2034 पर्यंत टोलवसुली सुरू राहणार असल्याचे मुजोर अधिकारी सांगताहेत. ही बाब खेदाची असून आम्ही आता हे सहन करणार नाही. सातारा जिल्ह्यातील नागरिक 5-10 किलोमीटरचा प्रवास करून 60 -60 किलोमीटरचा यापुढे टोल भरणार नाहीत. नितीन गडकरींना विनंती आहे, या गोष्टीचा तुम्ही बारकाईने विचार करावा. कराड ते पुणे यामधील अंतर मोजावे एवढ्या अंतरात तीन टोलनाके बसतात कसे? ही परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. सातारकरांची लूट होऊ देणार नाही. याच्यापेक्षा तीव्र आंदोलन शिवसेना उभे करेल. या पुढचं आंदोलन तासवडे टोलनाक्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून उभारण्यात येईल.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात 8 दिवसात बैठक
आंदोलकाना अधिकाऱ्यांनी 8 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घेण्याचा आश्वासन दिले. या बैठकीला नागरिकांची उपस्थिती असणार असून जोपर्यंत लेखी हमी मिळत नाही. तोपर्यंत पुढील तीव्र आंदोलन बंद केले जाणार नाही, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे