उत्तर प्रदेशातील जमीन व्यवहात गंडा : कराड तालुक्यातील युवकांची 30 लाखांची फसवणूक
कराड । उत्तर प्रदेशमधील सारंगपूर जिल्ह्यातील जमिन खरेदी- विक्रीच्या व्यवहारात लाखो रुपयांचे कमिशन मिळवून देतो, असे सांगून कराड तालुक्यातील युवकांची तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन सहदेव मोरे (रा. द हिल पार्क को. आॅप. सोसायटी, जिवदानी रोड, हिलपार्क, वसई, ठाणे), आदित्य ठाकूर, राकेश अग्रवाल व अली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हजारमाची (ता. कराड) येथील विकास हिंदुराव काटकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारमाची येथील विकास काटकर व येणके येथील दत्तात्रय गरुड हे दोघेजण मित्र आहेत. दत्तात्रय यांना डिसेंबर 2022 मध्ये आदित्य ठाकूर नावाच्या व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधून उत्तरप्रदेश येथील सारंगपूर जिल्ह्यातील सोना अर्जुनपूर गावातील 1.727 हेक्टर जमिनीची विक्री करायची असल्याचे सांगीतले होते. तसेच ही जमिन महाराष्ट्रातील बबन मोरे याच्या मालकीची असल्याचे सांगून त्यांना संपर्क करा, असे सांगीतले. त्यानुसार विकास काटकर व दत्तात्रय गरुड या दोघांनी बबन मोरे याच्या मोबाईलवर संपर्क साधून त्या जमिनीबाबत माहिती घेतली. त्यावेळी राकेश अग्रवाल नावाची मोठी व्यक्ती संबंधित जमिन खरेदी करण्यासाठी तयार असल्याचे मोरे याने सांगीतले. तसेच हा व्यवहार जुळवून दिला तर त्या मोबदल्यात मोठे कमिशन मिळेल, असेही सांगण्यात आले. त्यानुसार विकास, दत्तात्रय व बबन मोरे हे तिघेजण 14 डिसेंबर 2022 रोजी विमानाने देहरादून येथे गेले. त्याठिकाणी त्यांची आदित्य ठाकूर याच्यासह इतरांशी यांच्याशी भेट झाली. त्याचठिकाणी बबन मोरे व आदित्य ठाकूर यांच्यात जमिनीच्या व्यवहाराबाबत चर्चा झाली.
जमिन खरेदी करण्यासाठी राकेश अग्रवाल येणार असून त्यांना तुम्ही 34 लाख 50 हजार रुपये बिगा याप्रमाणे व्यवहार करा, असे ठाकूर याने त्यावेळी सांगीतले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी राकेश अग्रवाल नावाच्या व्यक्तीशी विकास व दत्तात्रय यांनी जमिनीचा व्यवहार केला. संबंधित जमिनीची विकास व दत्तात्रय यांच्या नावाने नोटरी करुन देण्यासाठी आरोपींनी पैसे मागीतले. त्यानंतर पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी विकास व दत्तात्रय कराडला आले. कराडात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्रांकडून तसेच स्वत:जवळील पैसे एकत्र करुन 30 लाख रुपये जमवले. हे सर्व पैसे त्यांनी आरोपींना आॅनलाईन पद्धतीने पाठवले. त्यानंतर नोटरी करुन देण्याबाबत टाळाटाळ होऊ लागल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे विकास काटकर व दत्तात्रय गरुड यांच्या निदर्शनास आले. तसेच आरोपींनी दिलेल्या धनादेशही बँकेत वटले नाहीत. त्यामुळे विकास काटकर यांनी याबाबत कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक मारुती सराटे तपास करीत आहेत.