पाण्यासाठी टाहो : शामगावात शेती वाचविण्यासाठी शेतकऱ्याचं अमरण उपोषण

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
शामगाव (ता. कराड) येथील ग्रामस्थांनी देवदर्शन करत राम कृष्ण हरीचा गजर करत अमरण उपोषणास सुरुवात केली. शामगावच्या चारी बाजुंनी शेतीचे पाणी आले, पण आमचे गाव वंचीत राहीले. पाणी देण्यासाठी 31 ऑक्टोंबरची अखरेची मुदत शासनाला ग्रामस्थांनी दिली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर अमरण उपोषणास सुरुवात केली.
उपोषणाच्या प्रारंभी शिव शंभो महादेवाचे दर्शन घेऊन श्री औकनाथ, ज्योतिर्लिंग, हनुमान, विठ्ठल रुक्मिणी आदि देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी गावातून टाळकरी- माळकरी ग्रामस्थ यांनी राम कृष्ण हरीचा गजर केला. पाणी आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे अशा घोषणा दिल्या. ठिकठिकाणी उपोषणकर्त्यांना सुहासिनी ओवळत होत्या.
गावातील महिला, पुरुष, युवक- युवती, ग्राम फेरीत सहभागी झाल्या होत्या. उपोषणकर्ते सरपंच विजय पाटोळे, कराड तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य भिमराव डांगे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य अशोक सुर्यवंशी, एम. डी. जाधव, शिवराज पोळ आदिंना उपोषण स्थळी विराजमाण करताना माळकऱ्यांनी हरी नामाचा जयघोष केला.