रागाच्या भरात सुषमा अंधारेंच्या कानाखाली लगावली?
बीड | ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रेचा शेवट बीड येथे उद्या दि. 20 मे रोजी होत आहे. पारस नगरीत सभा स्टेजची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या आल्या होत्या, त्यावेळी दोन गटातील वाद चव्हाट्यावर आला. बीडमधील स्थानिक ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये तुफान राडा झाला. गटातटाच्या वादातून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना रागाच्या भरात मी त्यांच्या कानाखाली ठेऊन दिल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. तर सुषमा अंधारे यांनी हा दावा फेटाळला आहे.
दोन गटातील वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना धक्काबुकी केली. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासमोरच या दोन नेत्यात वाद झाला आहे. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या आहेत. याबाबतचा दावा अप्पासाहेब जाधव यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत केला आहे. या वादानंतर अप्पासाहेब जाधव यांनी आपली भुमिका मांडली आहे.
सुषमा अंधारे यांनी मारहाणीचा दावा फेटाळला
या सर्व प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी आपली बाजू मांडली असून त्या म्हणाल्या, “शिंदे गटाकडून काही तरी प्लॅन झालेला दिसत आहे. असा काहीही प्रकार झालेला नाही. मला मारहाण काही झाली असती तर ते जिवंत परत गेले असते का ? मी आता महाप्रबोधन यात्रेवर फोकस करत आहे. अप्पासाहेब यांनी कोणाला तरी काही काम सांगितले. त्यानंतर त्यावरून दोघांचं काहीतरी टोकाचं भांडण झालं. त्या भांडणात मला मारहाण झाली वैगेरे ही माहिती चुकीची आहे. मला मारहाण झाली असती तर त्यांच्यावर मी केस केली असती. पण ते जे सांगत आहेत ती माहिती खोटी आहे”. असं स्पष्टीकरण सुषमा अंधारे यांनी दिलंय.