बोगस विवाह लावणारी टोळी : एक बंटी आणि 2 बबलीवर कराडला गुन्हा दाखल
येणकेतील युवकाला वसंतगडमधील एकाने फसविले

कराड | विवाहासाठी दोन युवकांकडून सव्वाचार लाख रुपये घेतल्यानंतर बोगस विवाह लावून देऊन संबंधित युवकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल केला. रमेश तानाजी नांगरे (रा. शेखरवाडी, ता. वाळवा) या युवकाने दिलेल्या फियार्दीवरुन वर्षा जाधव (रा. सुलतानगादे, ता. खानापूर, जि. सांगली), शंकर थोरात (रा. वसंतगड, ता. कराड), पूजा ऊर्फ स्नेहल पाटील व पूजा यादव (दोघीही रा. इचलकरंजी – जवाहरनगर, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसंतगड येथील शंकर थोरात हा विवाह ठरवतो, अशी माहिती शेखरवाडीतील रमेश नांगरे या युवकाला मिळाली होती. त्यानुसार शेखर व त्याच्या चुलत्यांनी वसंतगडमध्ये शंकर थोरात व वर्षा जाधव या दोघांची भेट घेतली. त्यावेळी दोघांनी विवाह ठरविण्यासाठी रमेश नांगरे याच्याकडून 2 लाख 25 हजार रुपये घेतले. दि.15 एप्रिल रोजी पूजा पाटील या मुलीला दाखविले. मुलगी पसंद असल्याचे सांगितल्यानंतर त्याच दिवशी दुपारी पलाश हॉलमध्ये त्या दोघांचा विवाह लावून दिला. विवाहानंतर पूजा शेखरवाडीत होती. आठव्या दिवशी पूजेसाठी पूजा हिची आई, मावशी, मावस बहीण आणि दाजी शेखरवाडीला आले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा शेखरवाडीला येऊन पूजाला काही दिवसांसाठी माहेरी इचलकरंजीला नेतो, असे सांगून पूजाला घेऊन गेले.
दरम्यान, दोनच दिवसांनी विश्रामबाग- सांगली पोलिस ठाण्यात वर्षा जाधव, शंकर थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती रमेश नांगरे याला मिळाली. त्यामुळे संशय आल्याने त्याने पूजा यादव हिच्या मोबाइलवर फोन करून पत्नी पूजा पाटील हिला सासरी कधी पाठवणार, अशी विचारणा केली. त्यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पत्नी पूजा सासरी न आल्यामुळे फसवणूक झाल्याचे रमेश नांगरे याच्या लक्षात आले. त्यानुसार त्याने कराड तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
येणकेतील युवकाचीही फसवणूक
येणके येथील युवकाचीही या टोळीने फसवणूक केली. टोळीने दोन लाख रुपये घेऊन 15 डिसेंबर 2022 रोजी येणकेतील युवकाचा साक्षी साळुंखे या युवतीशी विवाह लावून दिला. विवाहानंतर 25 ते 30 दिवस साक्षी येणके येथे राहिली. मात्र, आजारी बहिणीला इंदापूर येथून भेटून येते, असे सांगून साक्षी गेली, ती परत आलीच नाही. त्यामुळे युवकाचीही दोन लाखांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.