दरड प्रवन गावातील नागरिकांनी तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी


पाटण । दरड प्रवन गावातील नागरिकांनी तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील दरडग्रस्त गावांची पाहणी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. यावेळी प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील, प्रभारी गट विकास अधिकारी मिना साळुंखे यांच्यासह संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थलांतरितांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये पाणी, वीज यासह नागरी सुविधा उभारण्यात आल्या असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, ज्या ज्या वेळी जिल्ह्याला रेड आणि ऑरेंज अलर्ट असेल. त्या- त्या वेळी दरड प्रवन व धोकादायक गावांमधील नागरिकांना तातडीने निवारा केंद्रांमध्ये हलविण्याची कार्यवाही स्थानिक प्रशासनाने करावी. यास गावांमधील नागरिकांनी सहकार्य करावे. जिल्ह्यात सध्या अतिवृष्टीचा इशारा आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व प्रशासनाने खबरदारी घ्यावी, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत तसेच काही ठिकाणी शाळा व काही मंगल कार्यालये ही निवारा केंद्र म्हणून तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. त्यामुळे रेड आणि ऑरेंज अलर्ट मिळाल्यानंतर नागरिकांनी तातडीने या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी मिरगाव येथील नागरिकांची भेट घेऊन त्यांना त्यांच्यासाठी कोयनानगर येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये जाण्याविषयी सांगितले. तसेच अतिवृष्टीमुळे साकव वाहून गेलेल्या चाफेर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. बौद्ध वस्तीचा संपर्क पूर्ववत होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी बांधकाम विभागाच्या उपस्थित अधिकारी याना दिले. त्यानंतर ओझर्डे येथील दोन वर्षापूर्वी दरड कोसळलेल्या ठिकाणची ही त्यांनी पाहणी केली. याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला.



