रोजगार द्या, केवळ इव्हेंट नको : शंभूराज देसाईंच्या कानपिचक्या

सातारा प्रतिनिधी सकलेन मुलाणी
सातारा येथे रोजगार मेळाव्याच्या फलिताविषयी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीच शंका उपस्थित केली आहे. रोजगार मेळाव्याचा केवळ इव्हेंट होऊ देऊ नका, किमान काही लोकांना तरी रोजगार द्या, अशा शब्दात मंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित हा रोजगार मेळावा सुरू झाला असून रविवार व सोमवार असा दोन दिवसीय पार पडत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाच्या वतीने व खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने साताऱ्यात (दि. 21) रोजी महा रोजगार मेळावा सुरू आहे. मेळावा उद्घाटन कार्यक्रमासाठी गेलेल्या पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी तेथील इव्हेंट स्वरूपाचा डामडौल पाहून मेळाव्याच्या फलिताविषयी शंका उपस्थित करून मेळाव्याचा केवळ इव्हेंट करू नका अशा शब्दात अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. दरम्यान या महारोजगार मेळाव्यात एक हजार लोकांना रोजगार दिला जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगताच बघूया ना असे म्हणत मंत्री शंभूराजेंनी ‘वेट अँन्ड वॉच’ची भूमिका घेतली.
सातारा व कराड एमआयडीसीत उद्योगधंदे स्थिरावत का नाहीत?
सातारा जिल्ह्यातील तरूणांना रोजगार मिळावा म्हणून हा महारोजगार मेळावा संकल्पना चांगलीच आहे. परंतु सातारा शहर एमआयडीसी, कराड एमआयडीसीत उद्योगधंदे का स्थिरावत नाही. मोठ- मोठ्या कंपन्या का येत नाहीत यांचा विचार लोकप्रतिनिधी करणार की, केवळ शूरांचा जिल्हा अोळख असलेला जिल्हा बेरोजगारांचा म्हणून भविष्यात मिरवणार यांचाही विचार करणे गरजेचे आहे.