सातारा MIDC चे शिक्के हटवण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको : उद्योग मंत्र्यांचा थेट व्हिडिओ कॉल

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सातारा शहरा लगत असणाऱ्या एमआयडीसी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून एमआयडीसी लगतच्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर एमआयडीसीचे शिक्के लागले आहेत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे सातारा रहिमतपूर रस्त्यावर देगाव फाटा चौकात निगडी,वर्णे, राजेवाडी,देवकरवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन रास्ता रोको केला यावेळी एमआयडीसी आणि रहिमतपूर साताऱ्याकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली. यावेळी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉल द्वारे पंधरा दिवसांच्या आत हा विषय मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी रास्ता रोको स्थगित केला.
सातारा येथे नविन एमआयडीसी व्हावी, यासाठी निगडी, वर्णे, राजेवाडी, देवकरवाडी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर 2013 साली शिक्के मारण्यात आले आहेत. सदरील शिक्के हटवावेत, यासाठी गेल्या वर्षभरापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी चर्चेचा मार्ग अवंलबिला होता. मात्र, वर्ष होवूनही शिक्के न हटल्याने शेतकऱ्यांना आर्थिक त्रास होत असून जमिनीवर हक्क सांगता येत नसल्याने आक्रमक झालेल्या चारही गावातील शेतकऱ्यांनी सातारा- रहिमतपूर रास्ता आडवला. या रास्तारोकोमुळे वाहतुकीचा खोळंबा उडाला होता.
या चारही गावातील शेतकऱ्यांनी 100 टक्के एमआयडीसीला विरोध असल्याचे एक वर्षापूर्वी स्टॅम्पवर लिहून दिले आहे. मात्र, त्याकडे आजही शासनाचे लक्ष नाही. अनेकदा कलेक्टर, तहसीलदार यांना निवेदन दिलं तरी शासन ऐकत नसल्याने एमआयडीसी विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात 500 ते 550 आंदोलकांनी सहभाग घेतला, यामध्ये महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. यामध्ये एमआयडीसीला विरोध असल्याचे फलकही महिलांनी हाती घेत रस्त्यावर ठिय्या मांडला होता. याठिकाणी सातारा पोलिसांचा मोठा पोलिस फाैजफाटा ठेवण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण जाणवत होते. शेतकऱ्यांना फसवूण शिक्के मारणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असे म्हणत प्रशासनावरही आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.
जमिनीवरील शिक्के न हटल्यास 90 टक्के शेतकरी भूमिहीन होण्याची भीती
आम्ही भूमिहीन होवू नये, यासाठी हे आंदोलन सुरू आहे. अनाधिकृतपणे 2013 साली आमच्या जमिनीवर शिक्के मारले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस दिलेली नाही. या चार गावातील सर्व क्षेत्र बागायती असून त्यांची नोंद आहे. तेव्हा पिकाऊ जमिनीवरील शिक्के शासनाने काढावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. या भागात मोठे तलाव असून 225 बोअर असून त्याला पाणी आहे. या भागातील सर्व क्षेत्र बागायत म्हणून नोंद आहे. याठिकाणी फळबागा, ऊसक्षेत्र, दुबार पिके उभी असलेली दिसत आहेत. तेव्हा शासनाने मारलेले शिक्के काढावेत आणि कसायची जमिन परत करावी. आमच्या जमिनीवरी शिक्के न काढल्यास आम्ही 90 टक्के शेतकरी भूमिहीन होण्याची भीती आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.