इंग्रजांच्या सत्ता काळातही एवढा अन्याय समाजावर झाला नाही : आ. बाळासाहेब पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

हेळगाव | शासनाच्या कर्जमाफीच्या काळातील नियमित कर्ज भरणाऱ्या कर्जदारांना दिले जाणारे प्रोत्साहनपर अनुदान अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही. शेती विकासासाठी असणारी भू- विकास बँक बुडाली. जीवाची पराकष्टा करून देशासाठी नाव कमावणाऱ्या कुस्तीपटूंना येथे न्याय मिळत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळत नसून शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या जातात, असा हुकुमशाही पद्धतीचा अन्याय समाजावर होत आहे. इंग्रजांची भारतावर सत्ता होती. त्यावेळी सुद्धा एवढा अन्याय झाला नव्हता, अशी खंत आमदार बाळासाहेब पाटील यांनी कालगाव येथे व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संकल्पनेतून एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम राबविण्यात येतो. या पार्श्वभूमीवर कालगाव (ता. कराड) येथे मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्याशी राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, मसूरचे सरपंच पंकज दीक्षित, लालासाहेब पाटील, अशोकराव संकपाळ व संजय घोलप आणि राष्ट्रवादीचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुनील माने म्हणाले, लोकशाहीचा अस्त करण्याचे षडयंत्र भाजप सरकार करत असून 2024 ला आपला जर निर्णय चुकला. तर त्यानंतर पुन्हा लोकशाही प्रमाणे निवडणुका होतील, असे मला वाटत नाही. दोन गुजराती देश विकतात आणि दोन गुजरातीच देश घेतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी ग्रामस्थांमधून संतोष चव्हाण, अभिजीत पाटील, सतीश चव्हाण, योगेश चव्हाण यांनी आपल्या समस्या व आपले मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत माने यांनी केले. प्रास्ताविक रमेश चव्हाण यांनी केले. आभार सुधाकर चव्हाण यांनी मानले.