कराड- चिपळूण रस्त्याचा कोट्यावधींचा पैसा कोणाच्या खिशात? : बाळासाहेब कदम
रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भात रोपे लावून आंदोलन

पाटण प्रतिनिधी । संजय कांबळे
कराड- चिपळूण रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधींचा निधी खर्च झाला आहे. परंतु, या रस्त्याचे काम अतिशय नित्कृष्ट दर्जाचे झाले असून सर्वसामान्यांचा हा पैसा कोणाच्या खिशात गेला आहे. याची चौकशी झाली पाहिजे. सरकारी अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे न देता लोकांच्या समस्या समजून घेऊन लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी. अन्यथा येणाऱ्या 15 दिवसांत यापेक्षाही तीव्र आंदोलन करून कराड- चिपळूण रस्त्याची वाहतूक बंद पाडण्यात येईल, असा इशारा बाळासाहेब कदम यांनी दिला आहे.
कराड- चिपळूण रस्त्याच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत मंगळवारी संगमनगर (धक्का) येथे सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भात रोपे लावून शासनाचा निषेध केला. यावेळी पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ. स्नेहल जाधव, माजी प.सं. सदस्य बबनराव कांबळे, सचिन कदम (श्रमिक मुक्ती दल), सत्यजित शेलार, पंकज गुरव, दयानंद नलवडे(मनसे), अक्षय कदम(ठाकरे गट), डॉ. कदम(कॉंग्रेस), संपत जाधव, अश्फाक शेख, सुरज पंधारे, संदीप ताटे यांच्यासह कोयना विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी पं. स. सदस्य बबन कांबळे म्हणाले, कराड- चिपळूण रस्त्याचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे झाले असून या रस्त्यावर शेकडो खड्डे पडलेले आहेत. या पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक करताना नागरीकांना नाहक त्रास होत आहे. पावसामुळे या खड्ड्यांची आणखीनच दुरावस्था झाली असून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले कि वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या अपघातांमुळे आतापर्यंत अनेक जण जखमी झाले आहेत. काहीजण मृत्यू पावले आहेत.
पाऊण तास वाहतूक बंद
यावेळी आंदोलकांनी जवळपास पाऊण तास कराड-चिपळूण रस्त्याची वाहतूक बंद पाडली होती. यावेळी महसूल, बांधकाम, पोलिस आदी विभागातील अधिकाऱ्यांनी आंदोलकांची मागणी योग्यच असून संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले. आंदोलकांनीही सामंजस्याची भुमिका घेतली व हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले.